वाहतूक पोलिस यंत्रणा हतबल असल्याचे चित्र आहे. मात्र कशासाठी, याचे उत्तर मिळत नाही. रिक्षाला शिस्त लावण्याचे काम वाहतूक नियंत्रण पोलिस, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि महापालिका या तिघांचे आहे. तिघांनाही त्याचे सोयरसुतक नाही. त्यावर कोणाला बोलायला वेळ नाही. रिक्षा संघटना श्रेयवादात अडकल्या आहेत. एकमुखी नेतृत्व नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
सांगली प्रतिनिधी | रिक्षाचालकांमधील हद्दीचा वाद वाढत निघाला आहे. वाहतूक पोलिसांच्या खांद्यावर हात ठेवून रिक्षावाले आता कायद्याला आव्हान देऊ पाहत आहेत. येथील विजयनगरला जिल्हा न्यायालयाच्या दारातच रिक्षावाले एकमेकाला भिडले. या अनधिकृत थांब्यावर प्रवासी घेण्यावरून त्यांच्यात वाद झाला. एकमेकांना धक्काबुक्की केली. काहींनी डायलॉगबाजी करत बघून घेण्याचा दम दिला.
एका महिला प्रवाशाने या चौकात नियमित रिक्षावाल्याला हात केला. तो थांबला. महिला आत बसली. तोवर या थांब्यावरील रिक्षावाले धावून आले. महिला प्रवाशाला खाली उतरायला लावले. रिक्षावाल्याशी हुज्जत घातली. त्यात त्या महिलेला नाहक त्रास झाला. पुढे, दुसरी रिक्षा थांबली. ती महिला त्यात जाऊन बसली, तर एकजण तिकडे धावत सुटला. ‘तुला इंग्रजीत समजावून सांगायला पाहिजे का,’ असा दम दिला. ‘आमच्या आडवे याल तर खबरदार..!’ असा इशारा दिला गेला. हा प्रकार पंधरा मिनिटे सुरू होता.
विजयनगर येथे जिल्हा न्यायालयासमोरील रिक्षाचा अनधिकृत थांबा आहे. या ठिकाणी प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यांची सोय व्हावी, या हेतूने पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. दुचाकीस्वाराची किरकोळ चूक झाली, तरी पावती फाडणारे पोलिस रिक्षावाल्यांच्या बेदरकार वागण्याला पोटात घेतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. हा आता रिक्षावाल्यांना हक्क वाटू लागला आहे. ‘हा थांबा जणू आपण विकत घेतला आहे, या ठिकाणी दुसऱ्या कुणी प्रवासी भरला तर त्याला शिक्षाच दिली पाहिजे,’ असा आविर्भाव दिसून येत आहे. त्याचा एक नमुना आज दुपारी पाहायला मिळाला.