सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन विधानसभा ते संसदेपर्यंत संतप्त पडसाद उमटलेत. हत्येमागचा मुख्य सुत्रधार आणि मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक कधी होणार ? असा सवाल उपस्थित होतोय.आमदार उत्तमराव जानकरांनी तर कराडनं 32 खून केल्याचा आरोप केलाय.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे. विधानसभेपासून ते संसदेपर्यंत त्याचे पडसाद उमटले. नुसतेच विरोधक नाही तर सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीही याप्रकरणी पोलीस यंत्रणा आणि राजकीय लागेबांधेवर प्रहार केलाय. सुरेश धस यांनीही देशमुखांच्या क्रूर हत्येमागचा पट उलगडला तेव्हा संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं होतं.
या हत्येमागे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलंय. राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी कराडबाबत गंभीर आरोप केलेत. बीड जिल्ह्यामध्ये अफगाणिस्तानमधील कंधारपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. कराडनं 32 खून केल्याचा आरोप जानकरांनी केलाय. वाल्मिक कराड सिरीयल किलर आहे, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनीही केलाय. कराड अद्याप मोकाट कसा? असा सवाल करत ठाकरे गटानं पोलिसांवर निशाणा साधलाय.
वाल्मिक कराड कोण आहे.?
वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या दहा वर्षांपासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.
धनंजय मुंडेंचे राजकारण सुरू झालं तेव्हापासून वाल्मिक कराड सावलीसारखे त्यांच्यासोबत आहेत. जिल्ह्यातील सरकारी, सामाजिक सर्व कार्यक्रम कराड बघतात. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांचा दरारा होता. यापूर्वीही वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात सरकार खोलात जात नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा शरद पवारांनीही दिलाय. या प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची घोषणा सरकारनं केली आहे. बीडमधील संघटित गुन्हेगारी मोडून काढू, कोणालाही सोडणार नाही, असा इशारा फडणवीसांनी दिलाय. बीडचा बिहार होणं रोखण्यासाठी कोणती कडक पाऊलं उचलली जाणार ते पाहणं महत्वाचं आहे.

