मिरज प्रतिनिधी | राज्यातील ग्रामीण, शहरी, वाड्या-वस्त्यावरील पिडीत, अर्जदार महिलांपर्यंत आयोग पोहोचावा तसेच पिडितांना सुरक्षिततेचा आत्मविश्वास देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम राबविला जात असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मिरजेतील प्रसिद्ध हजरत शमनामीरा दर्गाहस्थळी भेट दिली. याप्रसंगी शहरातील महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी चाकणकरांनी आयुक्तांशी यासंदर्भात बोलून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
सांगली मध्ये जनसुनावणी नंतर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आढावा बैठकीत विविध विभागांचे सादरीकरण झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील बाल विवाह बाबत, गर्भलिंग निदान कायदा अंमलबजावणी यासाठी मोठ्या प्रमाणावर काम प्रशासनाकडून व्हावे यासाठी सूचना दिल्या. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती बाबत शोध मोहीम हाती घेण्याचे निर्देशही दिले. शाळेतून मुलींची पटसंख्या कमी होणाऱ्या तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
यावेळी मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक अतहर नाईकवडी, जमील बागवान, मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी यांच्यासहित दर्गाह कमिटीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

