Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi News: विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहचलाय. प्रचारासाठी राजकीय पक्षाकडे आता फक्त चार दिवसांचा वेळ शिल्लक राहिलाय.१५ ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता लागू कऱण्यात आली, तेव्हापासून राज्यात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ५३६ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये पैसे, दारु, अमली पदार्थ, मौल्यवान धातू यासह विविध बाबींचा समावेश आहे.
महिनाभरापासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडत आहे. निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयोगाने राज्यात आचारसंहिता लावली आहे. आयोगाकडून राजकीय पक्ष आणि नागरिकांसाठी काही नियम घालून दिले आहेत. मात्र, याचं काही जणांना भान नाही. महिनाभरात राज्यात ६ हजारांपेक्षा जास्त आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्याशिवाया आयोगाकडून ५३६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ६ हजार ३८२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ६ हजार ३८१ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात.
तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. ५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.