आज जरी महाविकास आघाडीतील नेते सर्व वाद मिटल्याचा दावा करत असले तरी महाविकास आघाडी मात्र फुटाण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. मुख्य म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यात शीतयुद्ध टोकाला गेले असून त्याचा केव्हाही स्फोट होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.
महायुतीने अर्धी लढाई जिंकली
गेले महिनाभर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये, काँग्रेस-शिवसेना उबाठा-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, जागावाटपावरून एकमत होताना दिसत नाही. महायुतीने उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात लोकसभेला विलंब केला आणि त्याचा फटका झेलला. मात्र ती चूक यावेळी सुधारत महायुतीने उमेदवार यादी जाहीर करण्यात आघाडी घेऊन अर्धी लढाई जिंकली. उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस (२८ आणि २९ ऑक्टोबर २०२४) शिल्लक असतानाही महाविकास आघडीत जागांचा वाद मिटताना दिसत नाही.
‘तेच तंत्र’ पुन्हा
लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना उबाठाने राज्यातील नेत्यांना बाजूला सारत थेट काँग्रेस ‘हायकमांड’ चर्चा करून, मनमानी करत अधिक जागा पदरात पाडून घेतल्या, पण जागांना न्याय मिळाला नाही. तीच पद्धत पंधरा दिवसांपूर्वी वापरण्याचे तंत्र अवलंबले होते. चार-पाच दिवसांपूर्वी तर शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बैठकीत असतील तर चर्चा होणार नाही, अशी भूमिका घेतली आणि थेट राहुल गांधी यांच्याशी उद्धव ठाकरे चर्चा करतील, असे जाहीर केले.
उबाठाची धमकी फाट्यावर
या धमकीला काँग्रेसने सपशेल फाट्यावर मारत, नाना पटोले नाही तर राज्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करा, अशी भूमिका घेत ‘हायकमांड’ने उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली. अखेर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशीच चर्चा केली आणि थोरात यांनी या चर्चेचा अहवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सादर केला.
स्वबळाची चाचपणी
या पवार-ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेतही थोरात यांनी नमती भूमिका घेतल्याबद्दल खुद्द राहुल गांधी यांनी शुक्रवारी २५ ऑक्टोबरला काँग्रेस छाननी समितीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करत बैठकीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. लोकसभेनंतर काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असून स्वबळावर सत्ता येऊ शकते का? यांची चाचपणी काँग्रेसकडून होत असल्याचे समजते. तशीच चाचपणी शिवसेना उबाठानेही केल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत जर समझोता झाला नाही तर शिवसेना उबाठाशिवाय काँग्रेस स्वबळावर किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढतील, अशी चर्चा होत आहे.

