महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये अजूनही चर्चा सुरूच आहे. यामध्ये काँग्रेसची ताकद असलेल्या जागांवरही शिवसेना ठाकरे गटाने दावा ठोकला आहे. त्यापैकी काही जागा ठाकरे गटाला जाहीरही झाल्या आहेत. यावरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे, ज्या ठिकाणी काँग्रेसला ‘आपण जिंकूच’ ही खात्री आहे अशा काही निवडक ठिकाणी काँग्रेसकडून सांगली पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. या पॅटर्नमध्ये प्रामुख्याने पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभेचा समावेश आहे.
मिरज विधानसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. यानंतर काहीही झाले तरी ही जागा लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे, तशी भूमिका स्थानिक काँग्रेस नेत्यांनी वरिष्ठांना कळवली आहे. वाटाघाटीत जागा काँग्रेसला सुटली तर ठीक नाहीतर लोकसभेप्रमाणे मिरज विधानसभेतही ‘सांगली पॅटर्न’ राबवू, असा आक्रमक पवित्रा स्थानिक नेतृत्वाने घेतला आहे. काँग्रेस पक्षातील स्थानिक नेत्यांनीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना हा इशारा दिल्याचे समजते. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळवण्यासाठी वरिष्ठांचे प्रयत्न सुरू आहेत.
या जागेसाठी काँग्रेसकडून मोहन वनखंडे, सी आर सांगलीकर इच्छुक आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून तानाजी सातपुते आणि जैनब शकील पिरजादे यांनी मातोश्री वर मुंबईत ठिय्या मांडला आहे. मुळात काँग्रेस नेतृत्व कुठेतरी कमी पडत असल्याची चर्चा जोरात आहे. तर काँग्रेस नेतेच मॅनेज झाल्याचे काही ठिकाणी बोलले जात आहे. मिरजेत महायुती कडून सुरेश खाडे यांना उमेदवारी जाहिर झाल्यानंतर महायुतीतील सर्वच घटक पक्ष कामाला लागले आहेत. तर महाविकास आघाडीकडून अजून तरी उमेदवार घोषित न झाल्याने मतदार संघातील महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.