गोपनीय खबऱ्या | विशेष प्रतिनिधी – महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा एक नवा फॉर्म्युला पुढे आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी 90 जागांवर लढणार असल्याचे स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी सायंकाळी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला होता.
मविआतील तिन्ही पक्ष प्रत्येकी 85 जागांवर लढणार असल्याचे ते म्हणाले होते. पण काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी दिल्लीत बोलताना त्यांनी हा फॉर्म्युला आता 90 वर पोहोचल्याचे सांगितले. ते म्हणाले, आमचा 85-85-85 चा फॉर्म्युला आता 90-90-90 वर पोहोचला आहे. उर्वरित 18 जागा आम्ही आमच्या मित्रपक्षांना सोडल्या आहेत. त्यातून किती सुटतील ते पाहिले जाईल. पण काँग्रेस 100 च्या वर जाईल का? याची बेरीज अजून करण्यात आली नाही. आमची चर्चा अजूनही सुरू आहे. आमचे उमेदवार सक्षम आहेत. त्यांच्यावरही चर्चा झाली आहे. आम्ही सीईसीपुढे ही नावे ठेवणार आहोत. पण महाविकास आघाडीत कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही. ही राज्याची निवडणूक आहे. त्यामुळे काही अडचणी असतात. पण त्यावरही तोडगा काढला जात आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावेळी सर्वच जागांवर सीईसीमध्ये शिक्कामोर्तब होईल असे सांगितले. आज आमची 55 जागांवर चर्चा झाली. त्यात मैत्रीपूर्ण लढतींचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सीईसीमध्ये सर्व जागांवर शिक्कामोर्तब होईल. हा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे ते म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे महाविकास आघाडीने आतापर्यंत 158 जागांवरील उमेदवार जाहीर केलेत.
यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या 45, ठाकरे गटाच्या 65 व काँग्रेसच्या 48 उमेदवारांचा समावेश आहे. विरोधी पक्षांच्या उर्वरित उमेदवारांच्या नावांची घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 29 ऑक्टोबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.