मनसे प्रमुख राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. सध्या ते अहमदनरहून निघाले आहेत.याआधी राज ठाकरे काल (30 एप्रिल रोजी) पुण्याला मुक्कामी होते. त्यानंतर आज सकाळी ते पुण्याहून निघाले.
वाटेत त्यांनी वढू बुद्रूक येथे जाऊन संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं आणि आता ते औरंगाबादच्या दिशेनं निघाले आहेत.
1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा आहे. या सभेला संबोधित करण्यासाठी ते आज शहरात पोहोचणार आहेत.
याआधी गुढीपाडव्याच्या सभेत राज यांनी मशिदीवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यासाठी त्यांनी 3 मेपर्यंत मुदतही दिली होती. आता 1 मे रोजीच्या सभेत राज ठाकरे नेमकी काय घोषणा करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
सभेला परवानगी, पण …
राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी मिळाली आहे. पण, या सभेसाठी काही अटी पोलिसांनी दिल्या आहेत. सभेसाठी या अटींचं पालन करावं लागणार आहे. अशा 16 अटी औरंगाबाद पोलिसांनी घातलेल्या आहेत.

“सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा- परंपरा यावरुन कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही, अगर त्याविरोधात चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती वक्तव्य घोषणाबाजी कोणीही करणार नाही याची आयोजक व वक्त्यांनी काळजी घ्यावी,” सभेसाठी अशी मुख्य अट आहे.

ध्वनी प्रदूषण होणार नाही, धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, सामाजिक वातावरण बिघडणार नाही. सामाजिक सलोखा बिघ़डेल असं वर्तन होणार नाही याची खबरदारी सभेदरम्यान घ्यावी लागणार आहे.
सर्व अटी नागरिकांना कळवण्याची जबाबदारी आयोजकांवर असल्याचे या रवानगीत म्हटलं आहे. या सभेसाठी 15 हजार लोकांनाच बोलावता येईल, वाहतूक नियमांचे पालन करावं लागेल. आक्षेपार्ह घोषणा देता येणार नाही. शस्त्रं, स्फोटक पदार्थ आणता येणार नाहीत, त्यांचं प्रदर्शन करता येणार नाही असं पोलिसांनी दिलेल्या अटीत म्हटलं आहे.

