” मास्तर… मास्तर तिरकमठा,पोरं पळाली धरा अंगठा !! “...ही मास्तरची खिल्ली उडवाणारी जुनी म्हण आता मिरज विधानसभा मतदारसंघात नव्याने वेगळ्याच अर्थाने चर्चेत आली असुन एका मास्तरनेच आमदारकीसाठी इच्छुकांना आंगठा धरायची वेळ आणल्या .
त्याचं झालंय असं की, पूर्वाश्रमीचा कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या मिरज विधानसभा मतदारसंघात रणकंदन माजलेल्या महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित करण्यास विलंब होत असल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील इच्छुकांचे चेहरे काळवंडले आहेत तर दुसरीकडे भाजपचे विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या उमेदवारीला त्यांच्याच भाजपचे मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष मोहन व्हनखंडे या मास्तरने ‘ अभी नही तो कभी नही ‘ या इर्शेने कडवे आव्हान उभे केले आहे.
महाविकास आघाडीतील सावळागोंधळ आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांची मिरज विधानसभा मतदारसंघावरची निसटत चाललेली पकड याचे भांडवल करत या व्हनखंडे मास्तरांनी सगळ्याच पक्षाच्या इच्छुकांच्या तोंडाला आत्ताच फेस आणलाय .
पुर्वी कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मिरज विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण प्रचारयंत्रणा ही मोहन व्हनखंडे नांवाचे मास्तरच यशस्वीपणे हाताळत होते . शिवाय राज्यपातळीरचीही खाडेंची सर्व प्रकारची कामे ही व्हनखंडे मास्तर बघत होते .पण उभयतामध्ये बिनसल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्हनखंडे मास्तरना बळ द्यायला सुरवात केली आणि खाडेंची डोकेदुखी वाढली. पत्नी अनिता वनकंडे यांना नगरसेविका करुन व्हनखंडे मास्तरनी मिरज शहरात आणि ग्रामीण भागात चांगलेच बस्तान बसवले . राजकारणात अनाभिशिक्त सत्ता टिकवायची असेल तर आधी स्वपक्षातील वरचढ होऊ पाहणाऱ्यांचे फडफडणारे पंख छाटावे लागतात .ही छाटणीची प्रक्रिया मंत्री सुरेश खाडे यांना जमली नाही . त्याचा खुबीने फायदा उठवत मोहन व्हनखंडे सरांनी भाजपमध्ये एक वेगळीच फळी निर्माण केली .
नियोजनबद्ध काटेकोर संघटना बांधणी हे व्हनखंडे मास्तरांचे खास वैशिष्ट्य आहे . मिरज ग्रामीण भागातील मंत्री सुरेश खाडे यांच्या बाजुची बरीच गांवपातळीवरची नेतेमंडळी व्हनखंडे सरांच्या गळाला लागल्याचं बोललं जातंय .
मिरज शहरातील भाजपची प्रमुख नेतेमंडळी, नगरसेवक यांनी आमदारकीला सुरेशभाऊ खाडे यांच्याबरोबर आणि खासदारकीला विशाल पाटील यांच्या बरोबर असा पवित्रा घेतला होता .पण मिरज विधानसभा मतदारसंघात आमदारकीचे पडघम वाजत असतानाही या मंडळींनी मंत्री खाडे यांची बाजू घेण्याऐवजी मिरजेतील शाही दरबारात प्रचंड शक्ती प्रदर्शन करत नुतन खासदार विशाल पाटील यांचेच ढोल वाजविले आणि आगामी विधानसभेला विशाल पाटील यांच्या सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत .
मिरजेचे सुरेश आवटी ,माजी महापौर किशोर जामदार, मैनुद्दीन बागवान , अशोक कांबळे अशा भाजपच्या ब-याच नेतेमंडळींनी मिरजेतील विशाल पाटील यांच्या सत्कारसमारंभाचे जंगी नियोजन केले होते . त्यामुळे आगामी आमदारकीच्या निवडणुकीच्या तोंडावर मंत्री खाडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे मानले जात आहे . मंत्री खाडे यांच्या बाजुची ही वाढती पडझड व्हनखंडे मास्तरना चांगलीच फायद्याची ठरत आहे .महाराष्ट्रातील दलित समाज भाजपपासून दुरावत चालल्यामुळे खासदारकीच्या निवडणुकीपुर्वीच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी मंत्री सुरेश खाडे यांची वर्णी लागेल अशी खाडे समर्थकांची अटकळ होती पण ती फोल ठरली. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळातुन बाहेर पडण्याचा मनोदय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सुरेश खाडे यांची वर्णी लागेल अशी खाडे समर्थकांना आशा होती पण त्यावरही फडणवीसांच्या घुमजाव करण्याने पाणी फिरले . सुरेश खाडे यांच्या या लागोपाठच्या अपयशामुळे व्हनखंडे गटात खुषीचा माहोल तयार झाल्याची चर्चा सुरू आहे . मोहन व्हनखंडे आणि कॉंग्रेसने मिरज विधानसभा मतदारसंघात जेवणावळीचा धुमडा पाडायला सुरुवात केल्यानंतर त्यावरती मंत्री सुरेश खाडे यांनी जोरदार टिका केल्या . मोहन व्हनखंडे हे भाजपकडे आमदारकीचे तिकिट मागत आहेत .या पत्रकारांच्या प्रश्नावरतीही मंत्री सुरेश खाडे यांनी सविस्तर भाष्य करणे टाळले आहे .
मिरज पूर्व भागातील मालगांव,आरग,बेडग या मोठ्या मतदारसंख्येच्या गांवात मंत्री सुरेश खाडे यांनी कसुन प्रचार करुनही अपक्ष विशाल पाटील यांना मोठेच मताधिक्य मिळालंय . गुंडेवाडी (ता. मिरज) येथे तर अपक्ष विशाल पाटील यांना डोळे विस्फारण्यासारखे मतदान झालंय . सोनी (ता. मिरज) येथे सर्व नेतेमंडळी भाजपच्या बाजूने असताना अपक्ष विशाल पाटील यांनी मतदानात मोठीच मुसंडी मारल्या . त्यामुळे मालगांव,आरग, बेडग,सोनी,येथील भाजपच्या नेतेमंडळींची भुमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे मानले जात आहे .मंत्री सुरेश खाडे यांनी सलगरे (ता. मिरज) येथील कॉंग्रेसचे माजी सरपंच तानाजी पाटील यांना भाजपमध्ये घेऊनही तिथं अपक्ष विशाल पाटील यांना मोठे मताधिक्य मिळालंय . तानाजी पाटील यांना भाजपच्या वळचणीला घेतल्यामुळे भाजपमध्ये मोठी नाराजी पसरली .आगामी विधानसभेला तानाजी पाटील भाजपमध्येच राहीले तर यापेक्षाही मोठे मताधिक्य सलगरेमधुन आणि आजुबाजुच्या १० गांवातुन महाविकास आघाडीला देऊ असा विश्वास सुरेश कोळेकर समर्थक आणि तानाजी पाटील विरोधक व्यक्त करत आहेत .
मिरज विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही . गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी घोषित करायला विलंब झाल्याने बाळासाहेब होनमोरे यांना प्रचारासाठी फक्त आठवडाच अवधी मिळाला होता .त्याचा होनमोरेंना जबरदस्त फटका बसला . मिरजेतील सत्कार समारंभात नुतन खासदार विशाल पाटील हे आमदारकीचा चेहरा समोर आणतील आणि निवडणुकीचा बिगुल वाजवतील अशी अपेक्षा होती पण तिथं विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी स्वता:ची आणि एकामेकांची टिमकी वाजविणेच पसंत केले . त्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीला असलेले अनुकूल वातावरण त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही .
खासदारकीच्या निवडणुकीत एरंडोली (ता. मिरज) येथे माजी सरपंच बाबगोंडा पाटील यांना मार्केट कमीटीचे तिकिट दिले हा मुद्दा ऐनवेळी कळीचा मुद्दा ठरला.माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कांबळे आणि बाजार समीतीचे सदस्य बाबगोंडा पाटील यांच्या एरंडोली गांवातच भाजपचे संजय पाटील यांना मताधिक्य मिळाले . एरंडोलीतील ही नाराजी अद्यापही नुतन खासदार विशाल पाटील दुर करण्याऐवजी हार तु-यातच मश्गूल असल्याने मिरज पूर्व भागात नाराजी वाढत आहे. महाविकास आघाडीत निवडणुकी आधीच तिकिटासाठी मारामारी चालल्या मग निवडणुकीनंतर यांच्यात हे काय दिवे लावतील? असा प्रश्नही लोकं उपस्थित करत आहेेत.एकंदरीत भाजप आणि महाविकास आघाडीत बेदीली माजली असताना भाजपचे मोहन व्हनखंडे मास्तरनी मात्र या मतदारसंघात रोज नवनवीन धडे गिरवायचा सपाटा लावलाय . त्यामुळे आगामी निवडणुकीत हे व्हनखंडे मास्तर कुणाकुणाला धडा शिकवितात? हे पाहणे उत्कंठावर्धक ठरणार आहे !!!