सांगली लोकसभेचे महायुतीकडून भाजपातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची सांगलीत जाहीर सभा पार पडली. या सभेतून त्यांनी मोदी सरकारच्या संपूर्ण कामाची माहिती दिली. यानंतर त्यांनी आपला मोर्चा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे वळवत म्हटले की, या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा आहे. एका बाजूस व्होट फॉर जिहाद ओरडणारे लोक आहेत, तर दुसरी बाजू व्होट फॉर विकास मानणारे आहेत. एका बाजूला परिवाराचा विकास करणारे लोक, तर दुसऱ्या बाजूला मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास करणारे लोक आहेत. एका बाजूस राहुल गांधींची चायनीज गॅरंटी आहे, तर दुसरीकडे मोदींची भारतीय गॅरंटी आहे. ही निवडणूक अशा दोन बाजूंमध्ये विभागलेली निवडणूक आहे, असा टीकास्त्र त्यांनी डागले आहे.
तसेच, कोविडसारख्या महामारीच्या काळात कोविडची लस देऊन देशाला वाचविण्याचे काम मोदी यांनी केले. राहुल गांधी अगोदर लसीकरणास विरोध करत होते, पण संपूर्ण देश लस घेत असल्याचे दिसताच एका रात्री गुपचूप राहुल गांधी यांनीही लस घेतली, असा टोलाही अमित शहांनी लगावला. तर, मोदी जे बोलतात ते करून दाखवितात. अयोध्येत भव्य राम मंदिर बनविणार अशी ग्वाही भाजपाने दिली होती. काँग्रेसने 70 वर्षे राम मंदिराचा प्रश्न रखडविला. मोदींनी पाच वर्षांत मंदिर बनविले, प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना केली आणि 500 वर्षांची देशाची प्रतीक्षा पूर्ण केली. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, प्रियंका गांधींनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकला. जे रामाच्या प्रतिष्ठापनेसोबत नाहीत, त्यांच्यासोबत देशातील जनता असणार नाही, असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला.
या सभेतून अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना कोणामुळे बंद झाला याचे उत्तर शरद पवार यांनी दिले पाहिजे, असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, टेंभू सिंचन योजना 1998 मध्ये सुरू झाली, पण 2014 पर्यंत काहीच झाले नाही. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर येताच काम सुरू झाले, म्हैसाळ सिंचन योजनेमुळे 65 हजार हेक्टर जमीन ओलीताखाली आली. आज महाराष्ट्रात 202 पैकी 101 साखर कारखाने बंद कसे झाले, 10 वर्षे कृषी आणि सहकार मंत्री असताना तुम्ही काय केले, राज्यातील 34 जिल्हा बँकांपैकी तीन चार बँका वगळता बाकी सर्व बँकांवर प्रशासक कोणाच्या चुकीमुळे आले, याची उत्तरे शरद पवार यांनी द्यावीत, असे आव्हानच अमित शहांकडून करण्यात आले.

