सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा शेवटी सुटलाच नाही. काँग्रेसकडून इच्छुक असणारे उमेदवार विशाल पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीही विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अर्ज कायम ठेवला.
आज (22 एप्रिल) अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. मात्र, विशाल पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. अर्ज मागे घेण्याची वेळ ही आज दुपारी 3 वाजेपर्यंत होती. तोपर्यंत विशाल पाटील यांचं मन वळविण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरू होता. मात्र शेवटपर्यंत विशाल पाटील हे त्यांच्या मतावर ठाम राहिले. त्यामुळे आता सांगलीत तिरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे. पण यामुळे जे उद्धव ठाकरेंना नको होतं तेच झालं आहे. मविआमध्ये बंडखोरी होऊ नये अशी उद्धव ठाकरेंची इच्छा होती. पण सांगलीत बंडखोरी झाल्याने ठाकरे नाराज होण्याची शक्यता आहे.
सांगलीत भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनाच पक्षाने पुन्हा तिकीट दिलं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वाटेला गेल्याने तिथे त्यांच्याकडून चंद्रहार पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर काँग्रेसमध्ये असलेल्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या विशाल पाटील यांना या निवडणुकीसाठी लिफाफा हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यामुळे आता या चिन्हावर निवडणूक लढवत मतदारांपर्यंत पोहचविण्याचं मोठं आव्हान विशाल पाटलांसमोर असणार आहे.
काँग्रेसकडून विशाल पाटलांवर कारवाई होणार?
विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसची डोकेदुखी ही वाढली आहे. कारण त्यांना शिवसेनेला असं पटवून द्यावं लागेल की, ते विशाल पाटलांना कोणत्याही प्रकारची मदत करत नाहीत. आम्ही त्यांच्या उमेदवारीच्या विरोधात आहोत. पक्षाचा आदेश डावलून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. याच कारणामुळे काँग्रेसला त्यांच्यावर कारवाई करावी लागणार आहे. त्यामुळे आता विशाल पाटील यांच्यावरील कारवाई ही अटळ आहे.
उद्धव ठाकरे काय करणार?
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही मतदारसंघात बंडखोरी होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे हे आग्रही होते. मात्र, तरीही सांगलीत जी बंडखोरी झाली त्यामुळे उद्धव ठाकरे हे नाराज असल्याचं बोललं जात आहे.जरी काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली तरी याबाबत उद्धव ठाकरेंची समजूत काढण्याच कामंही काँग्रेस नेतृत्वाकडे आहे. त्यामुळे आता या सगळ्याबाबत उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाच जणांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे
दरम्यान, सांगली लोकसभेच्या निवडणुकीतून पाच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहे. यात रेणुका प्रकाश शेंडगे, बापू तानाजी सूर्यवंशी, दिगंबर गणपत जाधव, प्रतीक प्रकाशबापू पाटील, सुरेश तुकाराम टेंगले या पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागून राहिलेली सांगली लोकसभा मतदारसंघात अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्यामुळे आत ही निवडणूक तिरंगी होणार आहे.

