राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून दिलेल्या अल्टिमेटमवरून हिंदू – मुस्लीम तणावाचे वातावरण निर्माण झालेले असताना, मनसेकडून आता सांगलीमध्ये मुस्लीम धर्मियांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मनसे जिल्हाध्यक्षांकडून जाहीर करण्यात आले. तसेच, ठरल्याप्रमाणे हनुमान चालीसा देखील लावणार असल्याचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.
त्याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जाणीवपूर्वक द्वेष पसरवण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील मनसेकडून करण्यात आला.
मनसेकडून होणार इफ्तार पार्टी – मनसेचे नेते राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्याची मागणी केली होती. यावरून राजकारण तापले आहे. राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेत 3 तारखेचा अल्टीमेटम देखील दिला आहे. यावरून राज्यात हनुमान चालीसा विरुद्ध आजान अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला ही परिस्थिती असताना आता सांगलीमध्ये मनसेकडून मुस्लीम धर्मियांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगली मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्याकडून जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर, राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमनुसार तीन तारखेनंतर हनुमान चालीसा लावण्यात येईल, मात्र कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही, असा विश्वास देखील तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे.
राज ठाकरे यांचा कोणत्याही धर्माला विरोध नसून मुस्लीम धर्मीयांच्या बाबतीत त्यांनी विरोध दर्शवला नाही. फक्त भोंगा मुद्दा हा सामाजिक असल्याचे सांगत विरोध दर्शवला आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक महाराष्ट्रात द्वेष पसरून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करण्यात येत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्याकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर सांगलीच्या मनसे संघटनेमध्ये सर्व समाजाचे नेते आहेत दलित, मुस्लीम त्याच्यबरोबर आणि समाजातल्याही नेत्यांचा समावेश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

