-
अंकलखोपचा म्हसोबा सामाजीक एकात्मतेचे प्रतीक
अंकलखोप प्रतिनिधी | प्रविण मिरजकर (तडाके) – येथील म्हसोबा हे अतिशय पुरातन देवस्थान आहे. ऐतिहासिक दृष्ट्या बळीराजाच्या नवखंडी राज्यामध्ये म्हसोबाचे स्थान होते. नवसाला पावणारा व जागृत म्हसोबाचे मूळ ठिकाण म्हणून अंकलखोपचा म्हसोबा प्रसिद्ध आहे. म्हसोबा म्हणजे फक्त दैव श्रद्धेचा विषय नसून सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारे देवस्थान आहे. अनेक लोकांचा कुलस्वामी म्हसोबा आहे. जे लोक पुरातन काळामध्ये व्यवसायानिमित्त भटकत होते, असे सर्वजण हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण देशभरातून अंकलखोपच्या म्हसोबाकडे येण्यासाठी निघत असतात. म्हसोबाचे मोठे चिंचेचे बन कृष्णा नदीच्या काठावर आहे. इथे आल्यानंतर वर्षभरानंतर सर्वांची भेटी होते. म्हसोबाच्या साक्षीने सुखदुःख वाटली जातात. लग्नाच्या सुपार्या फुटतात. म्हसोबाच्या साक्षीने लग्न होतात. मोठी यात्रा भरते. तिथे एक मोठं दगडी जात आहे, कैकाडी लोकांनी म्हसोबाच्या यात्रेनिमित्त दळणकांडन करण्यासाठी दिल्याची आख्यायिका आहे. पूर्वीच्या काळी गाढवाचा मोठा बाजार या बनात भरत होता.
म्हसोबा देवस्थानच्या अनेक दंतकथा आहेत
ऐतिहासिक काळामध्ये काही व्यापारी व्यापार करण्यासाठी जात असत .म्हसोबाच्या बागेत मुक्कामासाठी थांबले, त्यांचा बैल हरवला. व्यापाऱ्यांनी म्हसोबाला नवस केले, बैल परत आला. व्यापारी नवस फेडून पुढे निघून गेले. ते पुढे बादशहाच्या दरबारात गेले असता बादशाची पत्नी आजारी असल्याचे कळले, त्यांनी नेलेला म्हसोबाचा अंगारा लावण्यासाठी दिला. ती बेगम बरी झाली.
म्हसोबा देवस्थानला वतनी जमीन आहे. ती वेगवेगळ्या मानकरी, सेवेकरी यांच्यात विभागली गेली आहे. देवस्थानमध्ये मानकरी व सेवेकरी असे दोन विभाग आहेत. देवस्थानचे कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी मानकऱ्यांकडे असते. तर सेवकऱ्यांना दिलेल्या सेवा करावयाच्या असतात. यामध्ये बलुतेदारांचा समावेश आहे. त्यात जीवन जगण्यासाठी व्यवसायाशी निगडित सेवा आहेत.
म्हसोबा यात्रा कार्यक्रम
चैत्र पाडवा गुढीपाडवा देवस्थानच्या पूजेचे नवीन वर्ष या दिवशी म्हसोबाचे गुरव यांचे पूजेचे वर्ष बदलते. दुपारी ग्रामपंचायतीसमोर मानकरी, सेवेकरी ,ग्रामस्थ ,भक्त गोळा होतात. भटजी नवीन पंचांग पूजन करून यात्रेचे दिवस निश्चित करतात .मुख्य सासनकाठीचे पूजन होऊन त्या सहवाद्य म्हसोबाच्या बागेत जातात.
मानाचे बकरे
यात्रा निश्चित झाल्यानंतर पहिला दिवस मानाचे बकरे. मानाचे बकरे सहभाद्य बळी देण्यासाठी नेले जाते. त्यानंतर यात्रेला सुरुवात होते. मग इतर भक्तगणांचे नवसाचे बकरे व कोंबडा बळी दिला जातो .खरा नैवेद्य हा मातंगी देवीला असतो. तर गोडा नैवेद्य म्हसोबाचा असतो. याच दिवशी मानाचा गाडा असतो. नैवेद्य व गावगाडे दुसऱ्या दिवशी म्हसोबा देवासहित गावातील सर्व देवतांना पुरणपोळी, आंबील, नारळ असा नैवेद्य अर्पण केला जातो. या दिवशी गावगाडा असतो. ग्रामस्थ आपली बैले , वाहने वाजत गाजत म्हसोबा दर्शनासाठी जातात.
पालखी सोहळा
पुष्य नक्षत्रावर रामनवमी पालखी सोहळा सुरू होतो. पहाटे शिंग वादन व पारंपारिक वाद्य यांच्यासह मानकरी सेवेकरी भक्त ग्रामस्थ मंदिरात येतात. कृष्णा नदीला परडी सोडली जाते. सासनकाठीचे पूजन होते. भक्त, युवक, ग्रामस्थ उत्साहाने सासनकाठ्या नाचवत पालखी मार्गावर पुढे मार्गस्थ होतात.श्रींची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी मंदिरातून बाहेर पडते.” जणू राज्याभिषेक्त राजा आपल्या सर्व लवाज्यासह रयतेचे सुखदुःख पाहण्यासाठी जात आहे”
अशी पालखी सर्व मानकरी, सेवेकरी, ग्रामस्थ ,भाविक यांच्यासह निघते .पालखी मार्ग सडा रांगोळीने सजलेला असतो. फटाक्यांची आतषबाजी होत असते. पालखीधारकांच्या पायावर पाणी घातले जाते. सुहासिनी पंचारतीने ओवाळतात. मार्गाच्या दुतर्फा भक्तगण दर्शनासाठी गर्दी करतात. पालखीवर गुलाल खोबरे याची उधळण होते. सर्व परिसर “म्हसोबाच्या नावाने चांगभलं, मातंगी देवीच्या नावानं चांगभलं” अशा उद्घोषात दुमदुमून जातो. अंकलखोप गाव गुलालाने नाहून निघते. ग्रामप्रदक्षिणा करून पालखी गुरव गल्लीत येते. तिथून पालखी धावत मंदिराकडे जाते. मानकरी व सेवेकरी यांना मानाचा प्रसाद देतात.
पाकाळणी
चैत्र शुद्ध द्वादशी या दिवशी मंदिर स्वच्छ धुतले जाते. सासनकाट्या आपल्या ठिकाणी मार्गस्थ होतात. गुलाल पाणी शिंपडले जाते. नारळ व गुलाल दिला जातो. अश्या प्रकारे यात्रा संपन्न होते.
-
सालाबादप्रमाणे श्री म्हसोबा यात्रा अंकलखोप पुढील प्रमाणे
- दिंनाक १४/०४/२०२४ मानाचे बकरे (खारा नैवेद्य) मानाचा गाडा (गायकवाड गाडा)
- दिंनाक १५/०४/२०२४ गाव यात्रा, गोडा नैवेद्य, गाव गाडे
- दिंनाक १६/०४/२०२४ पालखी
पालखी ग्राम प्रदक्षिणे साठी पहाटे मंदितून निघून सकाळी ९:३० वा मंदिरात जाईल.
सूचना – आम्ही अंधश्रध्देचे समर्थन करत नसून पारंपरिक पद्धतीने सुरू असलेले रीतिरिवाज भाविक भक्त यांना माहिती मिळावी या उद्देशाने प्रसारित करीत आहे.