सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली. त्याचवेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या इमारतीवरील ‘काँग्रेस’ या शब्दाला पांढरा रंग फासण्यात आला. विशाल पाटील यांनी आता काँग्रेससाठी, वसंतदादांच्या विचारांसाठी आणि कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानीसाठी लढावे, असे आवाहन कार्यकर्ते करीत आहेत.
महाविकास आघाडीने सांगली काँग्रेसला दिली नसल्याचे तीव्र पडसाद उमटले. जत पॅटर्न राबवण्याची कालपर्यंच चर्च होती. ती आज मिरज तालुका काँग्रेस कमिटीने मूर्त रुपात आणली. आक्रमक काँग्रेस कार्यकर्ते शुक्रवारी (ता. १२) कमिटीसमोर जमले. त्यांची बैठक झाली. त्यात जिल्हा काँग्रेसवर होत असलेल्या जाणीवपूर्वक अन्यायाचा पाढा वाचण्यात आला. वसंतदादा घराण्याची कोंडी केली जात आहे, असा आरोप करत आता बंददार फोडून आत जाण्याची वेळ आली आहे, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या लढाईसाठी मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करत असल्याची घोषणा तालुक्याध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांनी केले.
‘काँग्रेस’वर रंग फासला
मिरज तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी ‘सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी’ या नामफलकावरील ‘काँग्रेस’ या शब्दाला पांढरा रंग फासला. काँग्रेस पक्षावर आमचे प्रेम आहे, मात्र जिल्ह्यातील काँग्रेसवर अन्याय होत असताना आम्ही शांत राहू शकत नाही, अशी संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा सांगलीच्या उमेदवारीबाबत फेरविचार करावा, असे आवाहन केले आहे. त्याचवेळी विशाल यांनी बंडाचा झेंडा हाती घेण्याची तयारीदेखील सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी आज पाच उमेदवारी अर्ज घेत लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. या परिस्थितीत काँग्रेसची दिशा काय असावी, यावर कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी किंवा मंगळवारी घेतला जाऊ शकतो. त्याबाबत आमदार विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक शनिवारी (ता. १३) होईल, असे सांगण्यात आले.
काँग्रेसने विशाल पाटील यांना उमेदवारी डावलून एक हक्काचा मतदारसंघ गमावला आहे. येथे विजयाच्या संधी असताना घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. अशावेळी काँग्रेसमध्ये राहून आम्ही लढू शकत नाही. त्यासाठी कमिटी बरखास्त केली आहे. विशालदादांनी बंद दारावर लाथ घालावी, मदनभाऊंसारखी जिगरबाज लढत द्यावी, अशी आमची मागणी आहे. ते लढणार आणि जिंकणार याचा आम्हाला विश्वास असल्याचे मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांनी सांगितले.

