सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – सांगली शहरात आचारसंहिता लागू असतानाच खुनाची घटना घडली आहे. राहुल संजय साळुंखे (वय १९, रा. जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, सांगली ) असे मयताचे नाव असून हल्ल्यात तेजस कारंडे (रा. जामवाडी) हा जखमी झाला आहे. दरम्यान मयत राहुल साळुंखे हा तीन महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलीच्या अपहरणातील एक संशयित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार आज बुधवारी रात्री सांगलीतील गणपती मंदिर चौकात मयत राहुल साळुंखे आणि त्याचा मित्र तेजस कारंडे हे दोघे दुचाकीवरुन निघाले होते. ते चौकात थांबले असता अगोदरपासून पाळतीवर असणारे हल्लेखोर अचानक त्यांच्यासमोर आले आणि भर गर्दीत राहुल साळुंखे याच्या पोटात एकापाठोपाठ एक चाकू आणि कोयत्याने वार केले. त्याला वाचविण्यास आलेल्या तेजस कारंडेच्या डोक्यावरही हल्लेखोरांनी वार केला. जीवाच्या आकांताने राहुल हा मंदिरासमोर असणाऱ्या नारळ विक्रेत्याच्या दुकानाच्या दिशेने पळत सुटला आणि तेथेच खाली कोसळला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने जाग्यावरच त्याचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या प्रकाराने सांगली शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान दि. १८ जानेवारी रोजी कोयत्याचा धाक दाखवून सांगली कोल्हापूर रस्त्यावर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे भर दुपारी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये मुलीच्या आईवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला होता. सांगली शहर पोलीस ठाणे आणि एल.सी.बी पथकाने अवघ्या काही वेळात आरोपींना जेरबंद करुन अपह्रत मुलीची सुखरुप सुटका केली. त्यामध्ये जे संशयित होते त्यापैकी एक मयत झालेला राहुल साळुंखे होता. तो काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.
घडलेल्या प्रकरणाने मात्र सांगली शहरासह परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.

