मुंबई प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन –महाराष्ट्र काँग्रेस सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या जागांवरील दावा सोडणार आहे. या मतदारसंघांतील काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व आक्रमकपणे जोर लावत होते आणि या जागांवर मैत्रीपूर्ण लढतही घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत होते.
परंतु लोकसभा निवडणुकीत या महत्त्वाच्या वळणावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दुखावण्यास दिल्लीतील काँग्रेस हायकमांड तयार नाही. त्यामुळे या तिन्ही जागांवरील दावा काँग्रेसने सोडला अशी माहिती गोपनीय खबऱ्याला सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकासआघाडीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरला आहे. सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरील तिढा सूटला असून आता अंतिम झालेल्या फॉर्म्युल्यानुसार महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना 22, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्ष 10 आणि काँग्रेस 16 जागांवर लढणार आहे. महाविकासआघाडी आणि इंडिया आघाडी मजबूत ठेवण्यासाठी काँग्रेसने सांगलीमध्ये एक पाऊल मागे घेतल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे.
आम्ही 35 पेक्षा जास्त जागा जिंकू- संजय राऊत
आज गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीकडून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रियादिली आहे. “आज शिवालयमध्ये 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद आहे. शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले सर्व उपस्थित राहतील. समाजवादी पार्टी, डावे पक्ष तिथे उपस्थित राहतील. ही एकजूट महाराष्ट्रात कायम राहील आणि आम्ही 35 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकू” असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
ठाकरे, पवार गटाचे उमेदवार जाहीर
शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपले बहुतांश उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या 22 पैकी 21 जागांवरील उमेदवार शिवसेनेने जाहीर केले आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील आपले बहुतांश उमेदवार घोषित केले आहेत. आता काँग्रेसच्या उर्वरित उमेदवारांची यादी देखील आजच्या पत्रकार परिषदेनंतर जाहीर केली जाऊ शकते.
पत्रकार परिषदेपूर्वी काँग्रेसची महत्त्वाची बैठक
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेपूर्वी काँग्रेसच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. बैठकीला बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सतेज बंटी पाटील, विश्वजीत कदम हे नेते उपस्थित राहणार आहेत. बैठकीत सांगली आणि भिवंडी बाबत रात्री दिल्ली पक्ष श्रेष्ठीने दिलेल्या निर्णयावर चर्चा होणार होणार आहे.

