सांगलीच्या जागेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला गंभीर इशारा दिलाय. मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करू नये. जर कोणी करणार असाल तर ती राजकीय अपरीपक्वता समजेन.
मात्र, जर त्याचे लोन पसरले तर राज्यात 48 जागावर तशा लढती होतील. आघाडी आणि युतीमध्ये एकतर मैत्री किंवा लढत होऊ शकते, असे सूचक वक्तव्य करीत शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी मैत्री पूर्ण लढती करणाऱ्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
- संजय राऊत यांचा काँग्रेस नेत्यांना इशारा..
काँग्रेस नेते नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे मी सांगलीची परिस्थिती पाहण्यासाठीच आलोय. इथे शिवसेनेचा उमेदवार लढणे योग्य आहे, असे मला वाटते असेही राऊत यानी स्पष्ट केले. महाराष्ट्रमध्ये 48 पैकी 35 पेक्षा अधिक जागा आम्ही जिकू. आघाडी किंवा युतीत एखाद्या जागेवरून वाद होतोच असे सांगत सांगलीतील काँग्रेस नेत्यांची एक वेगळी भूमिका आहे, त्या भूमिकेचा मी आदर करतोय. मात्र, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लढावी ही चर्चा झाली होते असे राऊत म्हणाले.
सांगली लोकसभेची सगळीकडे चर्चा आहे. सांगलीतुन शिवसेनेचे चंद्रहार पाटील दिल्लीत जाणार आहेत. मविआ सरकार पाडल्यामुळे सगळीकडे रोष आहे. त्यामुळे 400 पार चा नारा फसवा, भंपक आहे हे निकालानंतर कळेल. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, पुन्हा भाजप सत्तेत येणार नाही, हा जनतेचा मानस आहे, असेही राऊत यानी स्पष्ट केले.
सांगलीत मैत्रीपूर्ण लढत?
उद्धव ठाकरे यांचा पक्ष सांगली लोकसभा लढवण्यावर ठाम असल्याने काँग्रेस नेत्यांची कोंडी झाली आहे. ठाकरे सांगलीबाबत माघार घ्यायला तयार नाहीत. संजय राऊत यांची भाषा बदलली आहे, असा निरोप राष्ट्रीय नेतृत्वाला देण्यात आला. अशा परिस्थितीत काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत करावी का? याबाबत प्रदेश नेत्यांची भूमिका राष्ट्रीय समितीने जाणून घेतली. प्रदेशकडून त्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला. सांगलीत विजयाच्या पूर्ण संधी आहेत, तेथे मैत्रीपूर्ण लढतीला आम्ही तयार आहोत, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले होते.
उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा केली जाईल. त्यानंतर काँग्रेस आपला निर्णय घेईल, असे राष्ट्रीय नेत्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात असतील, शिवाय त्यांना हात चिन्हदेखील मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

