जयसिंगपूर प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – उदगांव (ता.शिरोळ) येथील बिरोबा मंदिरासमोर असलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना मंगळवारी (दि.२६) रात्री साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. यात सुमारे पाच झोपड्यांसह प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले.
यात एक शेळी गंभीर भाजून जखमी झाली आहे. इतर जनावरे व ट्रॅक्टर बाजुला केल्याने अन्य नुकसान टळले. अखेर जयसिंगपूर पालिका व शिरोळ दत्त कारखान्याच्या अग्निशमन दलाने पाचारण केल्यानंतर आग अटोक्यात आली.
शिरोळ तालुक्यातील ऊसाचा हंगाम अजून दोन दिवस आहे. त्यामुळे ऊसतोड मजूर आपल्या गावाला जाण्याच्या तयारीत आहेत. मंगळवारी सायंकाळी महिला जेवण करीत असताना एका झोपडीला आग लागली. वारा सुटल्याने आगीने रौध्ररुप धारण करीत अन्य तीन झोपड्यांनाही कवेत घेतले. आग लागल्यानंतर ऊसतोड मजूरांनी जनावरे व लगत असलेले टॅ्रक्टर व अन्य वाहने बाजूला केली.
यावेळी झोपड्यांमध्ये असलेल्या गॅस टाकीला मोठी आग लागल्याने मोठया उंचावर गॅसच्या टाकीतून आगीचे लोट जात होते. त्यानंतर जयसिंगपूर पालिका व शिरोळ दत्त कारखान्याच्या अग्निशमक दलाने घटनास्थळी पाचारण केले. व आग आटोक्यात आणली. मात्र यात पाच झोपड्यामधील अन्न, धान्य, कपडे असे प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. शिवाय एक शेळी या आगीत जखमी झाली आहे. सर्व साहित्य एका क्षणात जळून खाक झाल्याने ऊसतोड महिलांना अश्रू अनांवर झाले.पाच कुटुंबातील ऊसतोड मजूराचे संसार उघड्यावर पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

