गोपनीय खबऱ्या | ऑनलाईन प्रतिनिधी – महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती समोर आली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत सांगलीचा विषय ताणला गेला. सांगली सोडणार नाही, अशी भूमिका दोन्ही बाजूकडून घेतली गेली. त्यामुळे त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. पवार यांनी दोघांनाही सबुरीचा सल्ला दिल्याचे सांगण्यात आले.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी काही जागांबाबत तडजोड करू नका, असे स्पष्ट सांगितले असून त्यात सांगलीचा समावेश आहे. त्यामुळे सांगलीबाबत काँग्रेस माघार घेणार नाही, असा शब्द नाना पटोले यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिला. आमदार विश्वजीत कदम यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा लक्षात घेता प्रदेश नेत्यांवरही दबाव वाढला आहे. कदम यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
महाविकास आघाडीच्या जागांवर चर्चेचा गुरुवारी पुढचा टप्पा झाला. विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात बैठकीला उपस्थित होते. त्यात सांगलीचा मुद्दा अर्थातच ताणला गेला. कदम व पटोले यांच्याकडून ‘सांगलीबाबत शिवसेनेकडून परस्पर घोषणा का केल्या गेल्या?’, असा सवाल करण्यात येत आहे. तोच मुद्दा पटोले यांनी या बैठकीतही उपस्थित केला. त्यावर राऊतांनी कोल्हापूरबद्दल काँग्रेसने आम्हाला कुठे विश्वासात घेतले होते, असा उलटप्रश्न केल्याचे सांगण्यात आले. त्यावरून वाद ताणला गेला. ‘आम्ही सांगली सोडणार नाही, इतर जागांवर बोला,’ अशी भूमिका दोन्ही बाजूंकडून घेतली गेली. त्यात शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागली आणि या विषयावर पुन्हा चर्चा करण्याचा निर्णय झाला.
थेट ठाकरेंशी बोलणार?
सांगली लोकसभा मतदार संघाबाबत सध्या संजय राऊत हेच शिवसेनेकडून भूमिका मांडत आहेत. त्यांच्या भूमिकेविषयी काँग्रेसने जाहीर शंका आणि संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आता थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा आणि सांगलीची वस्तुस्थिती त्यांना सांगावी, हा मुद्दा काँग्रेसमध्ये चर्चेला आला होता. अर्थात, ठाकरे यांच्या मिरजेतील सभेनंतर काय होतेय, याकडेही काँग्रेसच्या नेत्यांचे लक्ष आहे.

