सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – महाविकास आघाडीची सांगली लोकसभेची जागा उबाठा गट लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सांगलीच्या जागेवर काँग्रेस आणि उबाठा गटाकडून दावा सांगण्यात येत असून अखेर हा तिढा सुटल्याची माहिती पुढे आली आहे.
या जागेवर आता डबल महाराष्ट्र केसरीचे चंद्रहार पाटील निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे.महाविकास आघाडीच्या अनेक बैठका होऊनही जागावाटपाचे सुत्र ठरताना दिसत नाही. आतापर्यंत मविआतील एकाही पक्षाने उमेदवारांची नावंही घोषित केलेली नाही. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून उबाठा गट आणि काँग्रेसमध्ये सांगली आणि रामटेक या दोन जागांवरुन वाद असल्याचे सांगण्यात येत होते.
मात्र, आता सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून काँग्रेसने ही जागा उबाठा गटाला सोडली असल्याचे बोलले जात आहे. या जागेसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शनिवारी महाविकास आघाडीच्या बैठकीत हा तिढा सुटल्याचे सांगण्यात येत आहे.