कोल्हापूर : मागच्या अनेक दिवसांपासून राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी तब्बल १८ हजार ९०१ मतांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे पराभूत उमेदवार सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली. त्यामुळे कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यात यश आले आहे.
पण या पराभवासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची चांगलीच कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. कारण निवडणुकीपूर्वी २ नोव्हेंबर २०२० रोजी बोलताना पाटील यांनी विरोधकांना कोल्हापुरमध्ये पराभूत झालो तर हिमालयात निघून जाईन असं खुलं आव्हान दिलं होतं. कोल्हापुरातून पळून आल्याचा टोला विरोधकांकडून सातत्याने लगावला जातो, असा संदर्भ देत पाटील यांनी कोथरूडमधून निवडणूक लढण्याचा किस्सा या कार्यक्रमात सांगितला होता. पुण्यात सुरक्षित म्हणून नव्हे तर पक्षाने सांगितले म्हणून आलो. माझी कोल्हापूर जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी होती. पण पक्षाच्या आदेशानुसार मी पुण्यात लढण्यासाठी आलो, असे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.
मी कोल्हापुरमधील मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आजही तयार आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा. मी तेथून निवडणूक लढवेल. मला हरणे माहीत नाही. निवडून नाही आलो तर हिमालयात निघून जाईल, अशा शब्दांत पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिलं होतं. भाजपच्या आजच्या पराभवानंतर महाविकास आघाडीकडून चंद्राकांतदादांना त्यांच्या या आव्हानाची आठवण करुन दिली जात असून आता हिमालयात कधी जाणार असा सवाल विचारला जात आहे.
इथंवरचं न थांबता शिवसेनेने कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांचे साधूच्या वेशातील फोटो असलेले बॅनर्स लावले असून त्यावर “हिमालय की गोद में” असा संदेश लिहीला आहे. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून ट्विटरवरती चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे ही घोषणा चंद्रकांतदादांच्या चांगलीच अंगलट आली आहे.