जत प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | विस्ताराने मोठा असलेल्या जत तालुक्याचे त्रिभाजन करावे. त्याचबरोबर जत नगरपरिषदेला भरीव निधी द्यावा, अशी मागणी आ. विक्रमसिंह सावंत यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात केली.
जतच्या विभाजनाचा मुद्दा उपस्थित करत, आ. विक्रम सावंत म्हणाले, जत तालुका विस्ताराने मोठा आहे. या तालुक्याचे त्रिभाजन करणे गरजेचे आहे असे असताना अद्याप जत तालुक्याचे त्रिभाजन करण्यात आलेले नाही. संख येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र अप्पर तहसील कार्यालय असून अडचण नसून खोळंबा आहे. या कार्यालयाकडे अप्पर तहसीलदार यांना वाहन नाही, तलाठी, मंडळ अधिकारी, कर्मचारी नाहीत. तालुक्याची भौगोलिक परिस्थिती बघून जतचे त्रिभाजन करावे ही जतकरांची अनेक दिवसापासूनची मागणी आहे. एमसँडला वाहतूक करण्यास परवानगी असूनही जतचे महसूल अधिकारी कारवाई करत असल्याची बाब आ. सावंत यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

