उपाययोजना न केल्यास जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा – सोमा (आबा) मोटे.
सांगोला प्रतिनिधी : खबऱ्या ऑनलाईन /विकास गंगणे – तालुक्याचे तत्कालीन कार्यसम्राट नेतृत्व, सध्याचे दिवंगत आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या प्रयत्नातून शिरभावीसह ८१ गावांना पाणीपुरवठा करणारी योजना अस्तित्वात आली. परंतु काही काम चुकार अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे घेरडी व परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. मौजे घेरडी गावाची लोकसंख्या पंधरा हजाराच्यावर आहे. यामध्ये गावठाण भागात असणारी लोकसंख्या निम्म्यापेक्षा अधिक आहे. घेरडी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या विहिरी आहेत. परंतु सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणीसाठा खूपच कमी झाला आहे. परिणामी गावाला खूपच कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे. यासाठी वरिष्ठ पातळी वरून प्रयत्नाची गरज आहे. परंतु, वरिष्ठ अधिकारी याची कोणतीही दखल घेताना दिसून येत नाहीत.
जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन वारंवार नादुरुस्त होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. नादुरुस्त झालेली पाईपलाईन लवकरात लवकर दुरुस्त केली जात नाही. त्यावर काहीच उपाययोजना संबंधित खात्याकडून होताना दिसत नाहीत.
- घेरडी गावामध्ये नेहमीच पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी कृत्रिम पाणीटंचाई करीत आहेत का.? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.आजघडीलाही जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन नादुरुस्त असल्याने गावात पाणी आलेले नाही. दुष्काळी झळा नागरिक सहन करत असतानाच जीवन प्राधिकरण योजना असून अडचण नसून खोळंबा आहे.
गावातील संपूर्ण पाण्याचा स्त्रोत कमी झाल्यामुळे नागरिक पाणी कुठून आणणार..? यावर उपाययोजना म्हणून घेरडी ग्रामपंचायतने नवीन बोअर घेतला. परंतु, त्यास सुरुवातीला चार-पाच दिवस चांगले पाणी होते. त्यानंतर पाणी कमी झाले. शासनाने संपूर्ण सांगोला तालुका दुष्काळी जाहीर केला असला तरी पाणीटंचाईच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरून काहीच उपायोजना होताना दिसत नाहीत. घेरडी गावांमध्ये सध्या दोन दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो. परंतु जीवन प्राधिकरणाचे पाणी नाही आल्यास संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. परंतु जीवन प्राधिकरणाचे अधिकारी काहीही लक्ष देताना दिसून येत नाहीत. लवकरच वरिष्ठ पातळीवरून उपाययोजना न केल्यास जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सोमा (आबा) मोटे यांनी दिला आहे.
जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन वारंवार नादुरुस्त असल्याने गावाला पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन लवकरच पाणीपुरवठा सुरळीत नाही केल्यास आम्ही स्वतः ग्रामस्थांसह जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याच्या तयारीत आहेत.

