मंगळवेढा : तालुक्यातील खुपसंगी पटेल वस्ती जिल्हा परिषद शाळेतील १९ मुलांनी जंगली एरंडीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाली. उलटी, मळमळ होवू लागल्याने मुलांनामंगळवेढा ग्रामीण रुग्णालय, सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे पालक वर्गातून भितीचे वातावरण निर्माण झाले असून पालक रुग्णालयात तळ ठोकून आहेत.
खुपसंगी पटेल वस्ती जिल्हा परिषद शाळेतील १९ विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात शोसाठी लावलेल्या जंगली एरंडी झाडांच्या पडलेल्या बिया सुरुवातीला काही मुलांनी खाल्ल्या. त्यांचे पाहून अन्य मुलांनीही बिया खाल्ल्या. दुपारी १२ वाजता या मुलांनी पोटात मळमळ व चक्कर येत असल्याची तक्रार प्रभारी मुख्याध्यापक बाबुराव माळी यांच्याकडे केली. त्यांनी या सर्व मुलांना खासगी वाहनातून मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ग्रामीण रुग्णालयातील डॉ. सुलोचना जानकर, मेडिकल ऑफिसर मंजूषा केंदुळे यांनी या मुलांची तपासणी करुन सहा मुलांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन घेतले. उर्वरीत १३ मुलांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- मुलांच्या काळजीने पालकांचे ठाण..
या मुलांच्या प्रकृतीत रात्री उशीरा सुधारणा झाली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सोलापूर येथील मुलांचीही प्रकृती सुधारत असल्याचे समजते. या घटनेमुळे पालक वर्ग धास्तावला असून ग्रामीण रुग्णालयात मुलांच्या काळजीने पालक रात्री उशीरापर्यंत थांबून होते. ही सर्व मुले पहिली व दुसरीच्या वर्गातील आहेत.
शाळा भरण्यापुर्वी शाळेजवळ लावलेल्या शोच्या झाडाच्या जंगली एरंडीच्या बिया मुलांनी खाल्ल्यानंतर त्यांना मळमळ व चक्कर येऊ लागली. त्यांना तत्काळ मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
-बाबुराव माळी, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा