आटपाडी : आटपाडी तालुक्यांमध्ये नूतन तहसीलदार सागर ढवळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली व अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. यामध्ये सतत गाजत असणारा प्रश्न म्हणजे तहसील कार्यालयातील खासगी कामगारांकडून नागरिकांना त्रास होत होता, अशा अनेक संघटनाच्या तक्रारी होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार सागर ढवळे यांनी तातडीने निर्णय घेऊन खासगी कामगार बंद केले आहेत.
या धाडसी निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. अनेक खासगी कामगाराकडून नागरिकांना नाहक त्रास होत होता. अशा तक्रारी होत्या या सर्व तक्रारीचा विचार करून तहसीलदार सागर ढवळे यांनी खासगी कामगार हटवण्याचा निर्णय घेतला. व प्रत्यक्षात कृती करून दाखवली. परंतु गाव कामगार तलाठी कार्यालयामध्ये झिरो तलाठी कार्यरत आहेत. प्रत्येक तलाठी कार्यालयामध्ये झिरो तलाठ्यांचा वावर असताना दिसून येत आहे. त्यातच तलाठ्यांचा अधिकार झिरो तलाठी वापरत आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना चुकीची माहिती देणे, कागदपत्र जुळवाजुळवी करावी लागत आहे, असे सांगून आर्थिक लेन देणं करणे. अशा अनेक गोष्टी घडत होत्या व आहेत. अशा गोष्टींना आळा कधी बसणार हा चर्चेचा विषय आहे. तहसीलदार ढवळे यांनी झिरो तलाठ्यांना हटवावे व शेतकऱ्यांची होणारी आर्थिक व मानसिक लूट थांबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
- झिरो तलाठ्यांना चाप लावणार ?
तलाठी कार्यालयातील सर्व कारभार झिरो तलाठी सांभाळत असल्यामुळे तलाठी त्यांचा कारभार आटपाडीतूनच चालताे. ते सजाच्या ठिकाणी हजर राहत नाहीत. या सर्व गोष्टीचा विचार करून तलाठी कार्यालयातील खासगी कामगार यांना बंद करण्याचा निर्णय तहसीलदार सागर ढवळे कधी घेतात व प्रत्यक्षात कारवाई कधी होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

