पंढरपूर : श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने कार्तिकी यात्रेकरिता प्रसादाचे १० लाख बुंदी लाडू बनवण्याचे नियोजन केले आहे. कार्तिकी एकादशी अवघ्या तीन दिवसांवर आल्याने लाडू बनवण्याची लगबग सुरू असून, दररोज सुमारे ५० हजार बुंदी लाडू तयार करण्यात येत आहेत.
श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रसादाचे बुंदी लाडू बनवीत आहे. बुंदी लाडू तयार करण्यासाठी बेसन, साखर, डबल फिल्टर शेंगदाणा तेल, बेदाणे, काजू, वेलदोडा, जायफळ आदी जिन्नसांचा वापर केला जात आहे. दररोज दिवस व रात्रपाळीमध्ये मिळून सुमारे ६५ कर्मचारी लाडू बनवण्याचे काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दररोज ५० हजार लाडू बनविण्यात येत आहेत. आचाऱ्यासह महिला व पुरुष कर्मचारी बुंदी तयार करणे, लाडू बनवणे, लाडू पॅकिंगचे काम करीत आहेत, अशी माहिती प्रसाद लाडू विभागप्रमुख राजाभाऊ राऊत यांनी दिली.
पर्यावरणपूरक अशा बटर पेपरच्या पिशवीमध्ये लाडू पॅकिंग करण्यात येत आहेत. लाडू पॅकिंग झाल्यानंतर वाहनाद्वारे ते विठ्ठल मंदिर समितीच्या लाडू केंद्रावर विक्रीसाठी पाठवण्यात येत आहेत. समितीच्या वतीने मंदिर परिसरामध्ये उत्तरद्वार, पश्चिमद्वार व दर्शन मंडप या तीन ठिकाणी लाडू विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या लाडू विक्री केंद्रावर लाडू प्रसाद खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
श्री विठ्ठल- रुक्मिणीचा प्रसाद म्हणून भाविक मोठ्या भक्तिभावाने बुंदी लाडू खरेदी करून आपल्या सोबत नेतात. यावर्षी कार्तिकीपासून भाविकांच्या सोयीसाठी ६५ एकर परिसरामध्ये लाडू विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
– बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

