पगार अडवणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई होणार का ?
तासगाव:- अखेर गोपनीय खबऱ्याच्या दणक्यानंतर तासगाव तालुक्यातील तुरची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आला आहे. मात्र एकच पगार किमान वेतन कायद्यानं देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना पगार मिळाला असला तरी वसुलीचे कारण सांगून जवळपास तीन महिने कर्मचाऱ्यांना पगारा पासून वंचित ठेवणाऱ्या तसेच किमान वेतन कायद्याला हरताळ फासणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई होणार का ? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी जवळपास तीन महिने पगारापासून वंचित होते. ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नव्हते. याबाबत विचारणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वसुली झाली नसल्याचे कारण दिलं जात होतं . मुळात ग्रामसेवक यांच्या मूलभूत ४३ कर्तव्या मध्ये कर वसुली करणे हे एक कर्तव्य समाविष्ट आहे मात्र या मूळ कर्तव्याला च संबंधित ग्रामसेवकाने केराची टोपली दाखवली होती. तर यावर मोगलाई म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी किमान वेतना पेक्षा ही कमी पगार देण्यात येत होता.याबाबत ची माहिती खबऱ्याला समजल्या नंतर चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित ग्रामसेवकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. चालू आर्थिक वर्षात सहा महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी याठिकाणी फक्त १९ टक्केच वसुली झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती लवण्यासाठीच संबंधित ग्रामसेवक उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे स्पष्ट झालं आहे.
याबाबत खबऱ्या ने सडेतोड वृत्तांकन केल्यानंतर तसेच गटविकास अधिकारी अविनाश मोहिते यांनी तत्काळ कार्यवाही केल्याने अवघ्या काही तासातच कर्मचाऱ्यांचे पगार अदा करण्यात आले. मात्र संबंधित ग्रामसेवकाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे. संबंधित ग्रामसेवकाने कर्तव्यात कसूर तर केलाच आहे शिवाय आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे त्यामुळे त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे .