प्रशासनाचा झारीतील शुक्राचारी कोण ?
कडेगाव:- तालुक्यातील वडीये रायबाग येथून रविवारी रात्री अवैध वाळूचे वाहन पळवून नेल्यानंतर तहसील प्रशासनाकडून संबंधित वाळू तस्करावर चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केला असला तरी वडीये रायबाग शेळकबाव येथून सुरु असलेल्या अवैध वाळू तस्करीला नक्की कोणाचा वरद हस्त आहे सध्या याचीच चर्चा सुरु आहे. काही झारीतील शुक्राचाऱ्यांमुळे प्रशासन नाहक बदनाम होत असून या शुक्राचाऱ्यांचा बंदोबस्त तहसीलदार अजित शेलार यांनी करावा अशी मागणी होत आहे.
तहसीलदार अजित शेलार यांच्या एंट्रीने बऱ्यापैकी बंद होत आलेला अवैध वाळू तस्करी पुन्हा जोमाने सुरु झाल्याने येरळा काठी पुन्हा अस्वस्था पसरली आहे. अजित शेलार यांच्या धडक कारवाईमुळे काहीसा सुखावलेला येरळा काठचा शेतकरी आता पुन्हा धस्तावला आहे. वडीये रायबाग येथे रविवारी रात्री एका वाळू तस्कराने नायब तहसीलदार सागर कुलकर्णी यांच्या पथकाने पकडलेले अवैध वाळूचे वाहन वादावादी करून पळवून नेले. वाहन पळवून नेत असताना संबंधित वाळू तस्कराने पथकातील तलाठ्यावर त्यास मदत करीत असल्याचा आरोप केलेला होता तसेच त्या तलाठ्याच्या संमतीनेच आपण नदीत उतरलो असल्याचा आरोप नायब तहसीलदार कुलकर्णी यांच्या समोर केला होता. तर तलाठ्यानेही संबंधित वाळू तस्कराने आपल्याला फोन केला असल्याची कबुली दिली होती मात्र नदीला जाऊ नको असं सांगितलं होतं अशी पलटी मारल्याने तस्कराने वाहन घेऊन पोबारा केला होता.
आता या प्रकरणात संबंधित वाळू तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र त्या तस्कराने नायब तहसीलदार कुलकर्णी यांचेसमोर तलाठ्यावर केलेला आरोपाचे काय? शिवाय भरारी पथकातील तलाठ्यास जर वाळू तस्कर फोन करून नदीला वाळू चोरीला जात असतील तर भरारी पथकांची विश्वासाहर्ता कितपत राहिली आहे? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय याठिकाणी चालू असलेली अवैध वाळू तस्करी प्रशासनातील काहींच्या मदतीनेच सुरु आहे असं खुलेआम बोललं जात आहे. याबाबत प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख आणि तहसीलदार अजित शेलार यांनी कठोर पावले उचलावी अशी मागणी होतं आहे.