कडेगाव :- कडेगाव तालुक्यातील महसूल प्रशासनाचा कारभार नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिला आहे,त्यातल्या त्यात अवैध वाळू तस्करी च्या बाबतीत तालुक्याने सर्व सीमा ओलांडल्या असल्याच पहावयास मिळाल आहे. सध्या कडेगावचे महसूल प्रशासन आणि त्याची भरारी पथके चर्चेत आहेत. यांचा कारभार म्हणजे “म्होरीला बोळा आणि दरवाजा मोकळा” अशा पद्धतीने सुरु आहे. रात्रीची अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी नेमलेली भरारी पथके आपलं काम इमानदारीने करत नाहीत हे वारंवार सिद्ध झाले आहे.
अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी नेमलेल्या भरारी पथकापैकी काही पथके भ्रष्ट आहेत हे ही सिद्ध झाले आहे. ठराविक भरारी पथकांच्या दिवशी हमखास अवैध वाळू तस्करी चालते हे ही सिद्ध झाले आहे मात्र या पथक प्रमुख किंवा सदस्यांवर कारवाई ऐवजी त्यांना अभय दिलं जात असल्याचे पहावयास मिळत आहे. प्रांताधिकारी दो विजयकुमार देशमुख आणि तहसीलदार अजित शेलार यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर लगेचच अवैध वाळू तस्करी वर कारवाईचा धडाका सुरु केला होता मात्र आता कारवाईचा वेग मंदावला म्हणण्यापेक्षा तो पूर्णपणे थांबला असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे थांबलेली अवैध वाळू तस्करी मात्र पुन्हा जोमाने सुरु झाल्याचं दिसत आहे.तहसीलदार अजित शेलार यांनी भरारी पथकप्रमुख आणि सदस्यांना कारवाई बाबत परिपत्रकाची लेखी आठवण करून दिली होती मात्र आता प्रत्यक्ष कारवाईची वेळ आली आहे असे म्हणल्यास वावगे ठरू नये.
शुक्रवारी मध्यरात्री म्हणजे शनिवारी पहाटे वांगी, शेळकबाव आणि वडियेरायबाग येथून अवैध वाळू तस्करी सुरु असल्याचे प्रशासनाला समजलं होते म्हणा किंवा येरळा काठच्या शेतकऱ्यांकडून कळवण्यात आलं होतं.यामध्ये भरारी पथकाने वडियेरायबाग येथे सुरु असलेली वाळू तस्करी रोखली. याठिकाणी एक वाहन सुद्धा ताब्यात घेतलं मात्र इथं मजुरांच्या साहाय्याने वाळू उपसा सुरु होता पण वांगी आणि शेळकबाव येथे यंत्राच्या साहाय्याने सुरु असणाऱ्या वाळू उपशाकडे भरारी पथक फिरकले सुद्धा नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यंत्राच्या साहाय्याने वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांना अभय दिलं जात आहे कारण त्यांचे अर्थपूर्ण संबंध आहेत असं शेतकरी आता खुलेआम बोलू लागले आहेत.
शेळकबाव व वांगी हद्दीतील अवैध वाळू उपसा बद्दल शेतकरी वारंवार तक्रार करत असताना जाणूनबुजून दुर्लक्ष केल जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आता यात प्रांताधिकारी दो विजयकुमार देशमुख व तहसीलदार अजित शेलार यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.