‘लोकांचे पैसे खायचे आणि राष्ट्रवादीच्या भोंग्याप्रमाणे बोलायचे त्यांनी थांबवावे’
कालच्या कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासारख्या चोरट्या माणसाला आरोप करण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही, असा हल्लाबोल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
राऊतांवर टीका करत असताना नितेश राणे यांची जीभ घसरली आहे. राऊतांनी पैसे का चोरले याचे उत्तर आधी द्यावे. लोकांचे पैसे खायचे आणि राष्ट्रवादीच्या भोंग्याप्रमाणे बोलणे त्यांनी थांबवावे. भाजपा नेत्याला आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या संजय राऊतांना भर चौकात चपला मारल्या पाहिजेत, असा घणाघात राणे यांनी केला आहे. आज ते मुंबईत बोलत होते.
यावेळी कोकणातील नाराज आमदारांवर ते म्हणाले, माझ्याकडे यासंदर्भात काहीही माहिती नाही. पण राज्यात अशी नाराजी अनेक आमदारांत आहे. नाणार रिफायनरीवरून अनेकजण नाराज आहेत. या नाराज आमदारांत अंतर्गत धुसमुस असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. यावेळी राऊतांनी केलेल्या आरोपांवर ते म्हणाले, आपलं राज्य आणि देश कायद्याने चालते. न्यायालयाने जो निकाल दिला तो तरी राऊत पाळणार का?, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे यांसंबधित राज्य सरकारने अंमलबजावणी करावी. कार्यकर्त्यांवर ज्या केस टाकल्या जातात त्या कुठल्या आधारे असतात याचाही माहिती त्यांनी द्यावी. राऊत सामान्यांचे पैसे खात आहेत. आमच्यावर आरोप करण्यापेक्षा हे पैसे कुठे ठेवले हे त्यांनी ईडीला सांगावे असा सल्लाही राणेंनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले, मशिदींबाहेर जे लाऊडस्पीकर लागले त्यावर कारवाई का होत नाही. तुम्ही एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला एक न्याय असं करत आहात. मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले, वाघाची डरकाळी देणारी शिवसेना लोंबतेगिरी करत आहे. आदित्य ठाकरेंनी थोडे नर्सरीच्या बाहेर पडावे. तुम्ही जे पेंग्विन पाळले आहेत ते काय डी टीम आहे का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

