काँग्रेसच्या (Congress) आमदारांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gadhi) यांची दिल्लीत भेट घेतली.
या भेटीमध्ये आमदारांनी पक्षातील नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. तसेच अनेक दिवसापासून रखडलेल्या विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा विषयही आमदारांनी बैठकीत काढला. त्यावर हा विषय आपल्याला माहिती असल्याचे सोनिया गांधी यांनी आमदारांना सांगितले.
तसेच आमदारांनी राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांबद्दल उघड नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याची गरज असल्याचेही आमदारांनी म्हटले आहे. चांगले सक्षम चेहरे निवडा महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसला चांगले दिवस येतील, असेही आमदारांनी म्हटल्याचे समजते. अर्थसंकल्पामध्ये मंत्र्यांच्या मतदारसंघात जास्त निधी दिला जातो. काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या निधीमध्ये मंत्र्यांनी ७०% निधी स्वतः च्या मतदारसंघासाठी घेतला. आमदारांच्या वाट्याला फक्त तीस टक्के निधी येतो, अशी तक्रार आमदारांनी केली. यावर सोनिया गांधी यांनी आमदारांना तुमच्या तक्रारी लिखित स्वरूपात देण्याच्या सूचना केल्याची माहीत आहे. सोनिया गांधी यांच्या दहा जनपथ येथील निवासस्थानी आमदारांनी त्यांची भेट घेतली. सोनिया गांधी आणि आमदारांमध्ये १० मिनिटे चर्चा झाली.
या बैठकीवेळी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte), अमित झणक (Amit Jhanak), कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal), सुरेश वरपूडकर (Suresh Varpudkar), तुषार राठोड, बळवंत वानखेडे, अभिजित वंजारी, विकास ठाकरे यांचा समावेश होता. भेट झाल्यानंतर थोपटे म्हणाले ही भेट राज्यातील प्रश्नासाठी होती. राज्यातील प्रश्नाबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबात काही चर्चा झाली का असा प्रश्न थोपटे यांना विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले, बैठकीत राज्यातील प्रश्नासंदर्भात चर्चा झाली. अभिजित वंजारी म्हणाले, बैठकीमध्ये राज्यातील पक्षवाढीसंदर्भात चर्चा झाली. नाराजी दूर झाली का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले, नाराजी नव्हतीच. त्यामुळे दूर होण्याचाही प्रश्न नाही. सर्व विषयावर बैठकीत समाधानकारक चर्चा झाली.
दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे, पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली होती. यात या आमदारांनी या नेत्यांकडेही आपले मनोगत सांगितले होते. राज्यातील काँग्रेसचे मंत्री स्वपक्षाच्या आमदारांकडे दुर्लक्ष करत असून मतदारसंघातील विकास कामांना निधी मिळवून देण्यात असमर्थ असल्याचा रोष आमदारांचा आहे. आमदार कैलास गोरंट्याल यांनी तर थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीबाबतच सोनिया गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त करणार असल्याचे जाहीर सांगितले होते. तर, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही विदर्भ वगळता इतर भागातील आमदारांना दुय्यम वागणूक देत असल्याची तक्रार करणार असल्याचे सांगण्यात येत होते. या विषयावर काय चर्चा झाली, ही माहिती मिळू शकली नसली तरी बैठकीत समाधानकारक चर्चा झाल्याचे आमदारांनी सांगितले.

