इंदापूर : म्हसोबाचीवाडी येथे विहिरीला रिंग तयार करण्याचे काम सुरु असताना मंगळवारी दुपारनंतर अचानक मुरुम व मातीचा ढिगारा कोसळल्याने चार मजूर विहिरीतील मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची दुर्दैवी घटना घडली.
१२० फुट खोल विहिरीमध्ये पडलेल्या चार मजुरापैकी एका मजुराचा मृतदेह आज सकाळी साडेदहाच्या सुमारास बाहेर काढण्यात आला आहे. पण उवरित तिघांची शोध अजूनही सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या तीन दिवसापासून याठिकाणी बचाव कार्य सुरु होते. विहिरीची खोली जास्त असल्यामुळे बचाव कार्याला मोठी अडचण येत होती. माती व मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (३२), जावेद अकबर मुलाणी ( ३०, मूळ रा.बेलवाडी, हल्ली रा. निंबोडी), परशुराम बनसीलाल चव्हाण (३०), आणि लक्ष्मण उर्फ मनोहर मारुती सावंत (५५) चौघेजण अडकले होते.
आज सकाळी चौघांचा शोध सुरु केल्यानंतर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका मजुराचा मृतदेह सुमारे ६५ तासानंतर एनडीआरएफ जवानांना मिळाला. उवरित तिघांची शोध मोहिम सुरु आहे.
दरम्यान, मागच्या दीड ते दोन महिने हे काम सुरू होते आणि अवघ्या दोन ते तीन दिवसांचे काम राहिले होते. या ठिकाणी तब्बल 11 मजूर काम करत होते. मात्र, पौर्णिमा असल्याने गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी सात मजूर गेले होते. हे सात जण कामावर नव्हते, अन्यथा काय घडले असते या नुसत्या कल्पनेनेच गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला.

