मुंबई : मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला. यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने दोन पाकिस्तानी नागरिक आरडीएक्सने भरलेला टँकर मुंबईहून गोव्याला घेऊन जात असल्याची माहिती दिली. फोन करणाऱ्याने स्वत:ची ओळख पांडे अशी सांगितले आहे. या फोननंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून पुढील तपासाला सुरुवात झाली आहे. एएनआय वृत्त संस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
गेल्या दहा दिवसांतील ही तिसरी धमकी आहे. तीन दिवसांपूर्वी वाहतूक नियंत्रण कक्षालाही धमकी देण्यात आली होती. त्यावेळी मुंबईत २६/११ सारखा दहशतवादी हल्ला घडवून आणला जाईल, अशी धमकी देण्यात आली. एवढेच नव्हेतर योगी आदित्यनाथ यांचे सरकार निशाण्यावर असल्याची माहिती मसेजद्वारे देण्यात आली. याचबरोबर काही ठिकाणी काडतुसे आणि एके ४७ पोहोचल्याचेही सांगण्यात आले होते.
हे प्रकरण गांभीर्याने घेत मुंबई पोलीस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ५०९ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

