सांगली ( प्रतिनिधी): मणिपूर मध्ये जे घडलं ते माणूसकीला काळीमा फासणार आहे. याचा कोणीही संवेदनशील नागरीक निषेध करीलच. संवेदनशील व माणूसकीची जाणीव असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील सर्व महिला संघटना या घटनेचा, हिंसेचा निषेध करण्यासाठी सोमवारी निदर्शने करणार असल्याची माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या आशा पाटील व युवक क्रांती दलाच्या प्रा.नंदा पाटील यांनी दिली.
त्या म्हणाल्या, शासन आणि सत्ताधीशांनी कोणत्याही आंदोलनाची दखल घ्यायचीच नाही.असा पणच केलेला दिसतो. हे लोकशाहीला आणि माणूसकीला घातक आहे. या हिंसेचा, महिलांवरील अत्याचारांचा आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आम्ही जाहीर निषेध करतोच, शिवाय त्याचबरोबर अशी काळी कृत्ये करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या शासनाचाही आम्ही तीव्र निषेध करणार आहोत.
सोमवार दि २४ रोजी सकाळी साडेदहा वाजता महात्मा गांधी पुतळ्या समोर निदर्शने केली जाणार आहेत. या आंदोलनात काँग्रेस महिला आघाडी , राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी शिवसेना ठाकरेगट महिलाआघाडी, शेतकरी कामगार पक्ष या राजकीय संघटननबरोबर युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था,जिजाऊ ब्रिगेड, युवक क्रांती दल, घे भरारी महिला ग्रुप, सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटना, घरेलू कामगार संघटना यांच्यासह विविध महिला संघटना आशा सामाजिक संघटनाही सहभागी होणार असल्याचे सांगितले.

