कडेगाव :- सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. अर्धा पावसाळा संपत आला तरी पाझर तलाव कोरडेच आहेत. ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यामुळे सिंचन योजनांच्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांची मागणी वाढत आहे. मात्र आवर्तन सुरू करण्यास विलंब होत आहे. यामुळे शेतीपिके वाळून चालली आहेत. यावर उपाययोजना म्हणून ताकारी म्हैसाळ आणि टेंभू या तिन्ही सिंचन योजना तात्काळ सुरू कराव्यात अशी मागणी माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली. राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे या अधिवेशनात माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या योजनांच्या आवर्तनाचा प्रश्न मांडला यावेळी आमदार डॉ.विश्वजित कदम म्हणाले गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होत आहे, परंतु सांगली जिल्ह्यात गतवर्षाच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज या दुष्काळी तालुक्यांमध्ये तर खूपच बिकट स्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे सिंचन योजनांचे आवर्तन सुरू करणेबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना मी लेखी पत्र दिले आहे तसेच सूचना दिल्या आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी यांचेशी बोललो आहे. आता शासन स्तरारून उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा शासनस्तरावरून तात्काळ आदेश द्यावेत व ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजनांचे आवर्तन सुरू करावे अशी मागणी माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली. यामुळे सिंचन योजनांच्या अवर्तनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

