प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांच्या भूमिकेकडे लक्ष
कडेगाव :- कडेगाव उपविभागातील काही तलाठयांनी बेकायदेशीर पणे दुबार नोंदी धरल्याचे खात्रीलायक पुरावे मिळताच गोपनीय खबऱ्याने याबाबत सडेतोड आणि विश्वासनीय वृत्तांकन केल्यानंतर या दुबार नोंदी पाठीमागील काळे सत्य आता समोर येऊ लागले आहे. दुबार नोंदीतून काही तलाठयांनी लाखोंची माया जमवल्याचे वृत्त खबऱ्याच्या हाती लागले आहे. संबंधित तलाठयांनी यामध्ये कायदा आणि कार्यपद्धती ला अक्षरशः तिलांजली दिली आहे. आता याबाबतीत कडेगावचे धडाकेबाज प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
दहा-दहा,वीस-वीस वर्षांपूर्वी झालेल्या व्यवहारांच्या नोंदी धरताना कोणती काळजी घ्यावी हे बहुधा संबंधित तलाठी महाशयांना माहित नसावं किंवा त्यांनी बेकायदेशीर नोंद धरण्याचे ठरवलेचं असावं. कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता किंवा वरिष्ठांचे कसलेही मार्गदर्शन न घेता हा कारभार केला असल्याचे सिद्ध झालं आहे. पलूस तालुक्यातील तलाठयांनी तर दुबार नोंदी धरताना कायदा अक्षरशः बासनातच गुंडाळून ठेवला होता हे स्पष्ट होतं आहे.
मुळात कोणत्याही तलाठयास दुबार नोंद धरण्याचा कायद्याने अधिकार दिलेला नाही किंवा दुबार नोंद धरणे हे बेकायदेशीर आहे. मुळात दुबार नोंद हा प्रकार फक्त खरेदी विक्री व्यवहारातच आढळून येतो. यामध्ये पूर्वी धरलेली नोंद रद्द झाल्याने संबंधित व्यक्ती तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची त्या ठिकाणाहून बदली झाल्यानंतर पुन्हा नोंदी साठी अर्ज करतो असं बहुतांशी प्रकरणात समोर आलं आहे.यासाठी तलाठयाकडे आलेल्या प्रत्येक नोंदी बाबत पूर्वी नोंद धरली आहे का? याची खात्री करणे हे त्या तलाठयाचे पहिलं काम असते. खरेदी विक्री व्यवहार जर ताजा किंवा लगतच्या काळातील असेल तर ठिकाणी आहे पण दहा-दहा, वीस-वीस वर्षांपूर्वी च्या नोंदी धरताना हि खबरदारी घेणे गरजेचं आहे मात्र याठिकाणी जाणूनबुजून खबरदारी घेण्याचं टाळलं आहे हे स्पष्ट होतं आहे.
दुबार नोंदी मधील बहुतांशी नोंदी पूर्वी रद्द झालेल्या आहेत. या नोंदीवर प्रांताधिकारी यांचेकडे अपीलात जाने गरजेचं असताना संबंधित तलाठयांनी इथं कायदा आणि कार्यपद्धती ला अक्षरशः कराची टोपली दाखवली आहे त्यामुळे दुबार नोंद धरणारे तलाठी शिक्षेस पात्र आहेत. आता याबाबत कडेगावचे धडाकेबाज प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील आहे.

