रजेवर असतानाही बंदोबस्त दिला जात असल्याच्या कारणावरून, तसेच सातत्याने त्रास दिला जात असल्याच्या कारणावरून जिल्हा वाहतूक शाखेच्या एका महिला पोलिसाने जीवन संपत असल्याचा एक मेसेज थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवला आणि जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली.
जिल्हा वाहतूक शाखेत जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली ही महिला गेले काही दिवस रजेवर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या महिलेने आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना आपण आत्महत्या करत असल्याबाबत एक मेसेज पाठवला. त्यामुळे जिल्हा पोलीस दलही सतर्क झाले असून या महिलेचा ठावठिकाणा शोधण्यासाठी काही पथके पाठवण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
आपल्याला सातत्याने जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून जाणीवपूर्वक मुद्दाम विविध ठिकाणच्या बंदोबस्ताची ड्युटी दिली जात असल्याचा आरोप या महिला कर्मचाऱ्याने केला आहे. सन 2020 मध्ये या महिला पोलिसाची जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात बदली झाली होती. तेथे सातत्याने आपल्याला दूर अंतरावरील ड्युटी दिली जात असल्याच्या व त्रास दिला जात असल्याच्या कारणावरून या महिलेने थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना हा मेसेज पाठवला आहे.
दरम्यान जिल्हा पोलीस दलात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असून कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे, तसेच यातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये विसंवाद होत असून पोलीस ठाण्यांमधील ही सध्याची स्थिती बदलण्यासाठी तातडीने नवनियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे असाही मतप्रवाह वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आहे.

