मुंबईः प्रियकराने शरीरसंबंध ठेवताना कधीकधी केलेली बळजबरी बलात्कार ठरु शकत नाही, असा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रियकराविरोधातील बलात्काराचा खटलाच रद्द केला.
न्यायालय म्हणाले, पीडित मुलीचे आरोपी मुलासोबत आठ वर्षे प्रेमसंबंध होते.
दोघेही भेटले की शरीरसंबंध ठेवायचे. मुलगी सुज्ञ होती. शरीरसंबंध ठेवल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील हेही तिला ज्ञात होते. मुलीचे प्रेम होते म्हणून तर तिने शरीरसंबंधासाठी समंती दिली होती. त्यामुळे प्रेमात शरीरसंबंधासाठी कधीकधी केलेली बळजबरी बलात्कार ठरु शकत नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
पीडित तरुणी २७ वर्षीय आहे. तिची आरोपीसोबत २००८ मध्ये orkut वेबसाईडवर ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली. नंतर ते एकमेकांना भेटू लागले. २०१३ मध्ये मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. दोघांच्या कुटुंबाला त्यांचं नातं मान्य होतं. त्याने तिला विवाहाचे आश्वासन दिले होते. पुढे त्याचं नातं शरीरसंबंधांपर्यंत जाऊन पोहोचलं. ती विवाहासाठी वारंवार विचारत होती. पण नंतर तो टाळू लागला. काही दिवसांनी त्याने भेटणे बंद केले. नंतर आरोपी कुटुंबाची बदनामी करणारे मेसेज पाठवत होता. अखरे पीडितेने १७ फेब्रुवारी २०१६ रोजी याची तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला. बोरीवली न्यायालयात याचा खटला सुरु झाला. हा खटला रद्द करावा, अशी मागणी करणारा अर्ज आरोपीने न्यायालयात केला. त्यास न्यायालयाने नकार दिला. प्रियकर शरीरसंबंध ठेवताना बळजबरी करत होता. ही कृती बलात्काराच्या कक्षेत मोडते, असे न्यायालयाने नमूद केले.
याविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली. हा खटला रद्द करावा, अशी मागणी आरोपीने केली. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने पीडितीचा दावा अमान्य केला. केवळ विवाहाचे अमिष दाखवले म्हणून पीडितेने शरीरसंबंध ठेवण्यास होकार दिला नव्हता, तर पीडितेचे आरोपीवर प्रेम होते. या प्रेमामुळेच तिने शरीरसंबंध ठेवण्यास संमती दिली होती. अशावेळी कधीकधी केलेली बळजबरी बलात्कार ठरु शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

