Maharashtra Political News: विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा अंतर्गत कलह मोठ्या वळणावर येऊन पोहोचलाय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Congress Leader Balasaheb Thorat) यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती दिल्लीतील काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय घेणार? थोरातांचं मन वळवणार की, नवा बदल घडवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

केंद्रीय नेतृत्व बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले जात असल्याचीही माहिती मिळत आहे. पण बाळासाहेब थोरात मात्र आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच, राजीनाम्याच्या पत्रात थोरातांनी आपण काँग्रेसच्याच विचारांनी पुढे जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात केलं आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता. नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसमधील कलह टोकाला गेल्याचं सर्वांसमोर आलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सत्यजीत तांबे यांच्या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबतची नाराजी उघडपणे जाहीर झालेली होती. अशातच आता बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्या संदर्भातील वृत्तानंतर ही नाराजी अगदी टोकाला पोहोचल्याचं स्पष्ट होत आहे.

