कोल्हापूर,: रात्रीचे नऊ वाजल्यापासून विनाकारण भरधाव वेगात तरुणांच्या मोटारसायकली फिरू लागतात.ताठरलेले डोळे, शिवराळ भाषा वापरत कुठे गलका सुरू होतो. शुल्लक कारणावरून वाद, दहशत माजते. मिटून जाते. रात्री नऊ ते बारा वेळेस रस्त्यावरील चौकातील संशयितांच्या दहशतीचा खेळ शहराला वेठीस धरत आहे. नेमके याच वेळी पोलिस ठाण्यात हजेरी व रात्र गस्तीच्या नियोजनात पोलिस गुंग असतात. याचा अंदाज घेत मोजक्या टोळक्यांकडून रात्री होणारी दहशत अनेक व्यवसायाला खीळ बसवत असल्याचे चित्र रात्रीच्या फेरफटक्यात दिसत आहे.
शुक्रवार रात्रीचे नऊ वाजता तावडे हॉटेल चौकातून तिबल सिट मोटार सायकलस्वार भरधाव वेगात सांगली फाट्याकडे गेले. एका पंपावर पेट्रोल भरले, दोन चार फेऱ्या मारल्या, सांगली फाट्यावरील पान टपरीवर दहा मिनिटं तिथे उभारले, तिघेजण धुंदीत बरळू लागले. उचगाव फाट्याजवळच असेच तिघे मोटारसायकलस्वार सर्व्हिस रोडने घिरट्या मारत पानपट्टी टपरीवर गेले. तेथे काही वस्तू घेतल्या. थोडे पैसे दिले, बाकी उदारी करून पुन्हा निघाले ते लोणार वसाहतीकडे घुसले.
रात्रीच्या वेळी तरुण मोटारसायकलवरून मार्केट यार्डात आले. घाऊक भाजी मंडईच्या मागील अंधारात गेले. अर्ध्या तासाने नशेच्या धुंदीत परतले. याच वेळी दहा ते साडेअकराच्या सुमाराला कावळा नाका ते तावडे हॉटेलपर्यंतचे चौक, उद्यमनगर रोड, सायबर चौक, टेंबलाईवाडी चौक, उचगाव चौक आदी ठिकाणच्या मांसाहारी गाड्यांपासून जवळच कुठे गर्दी करून, तर कुठे एक दोघांचे मद्यपान सुरू होते. मार्केट यार्ड रोडकडील मद्य दुकानाच्या बाजूला खुल्या जागेत मद्यपान करून काहीजण धुंदीतच भरधाव वेगात गाड्या रस्त्यावर घेत होते.
अशाच अवस्थेतील मोजके अकराच्या सुमारास बसस्थानक परिसरात आले. वडा पाव, पोहे पार्सल घेतले. आपापसातच खुन्नस देऊन बघणे, भांडल्यासारख्या आवाजात बोलत काही मिनिटांत निघून गेले.
सांगली फाट्याजवळील सर्व्हिस रोडवर संशयितांचा अंधारात वावर होऊ लागला. अंधारात महिलेच्या चकचकीत वेशभूषेत थांबलेल्या ‘त्या’ व्यक्तींचे बोलणे सुरू झाले. मोबाईलचे उजेड चमकले. पुढे काही मिनिटांसाठी सगळे गायब झाले. काही वेळात अर्वाच्च बोलत निघून गेले. येथे काय घडतंय याचा अंदाज आहे; पण कोणी उघड बोलत नाहीत. थोड्याफार फरकाने असाच अनुभव गोकूळ शिरगाव महामार्गावर दोन-तीन ठिकाणी आडोशाला घडत असल्याची कुजबूज होते. हे सगळं घडत असताना पोलिसांची फेरी क्वचित होते.
पोलिस रात्री बारानंतर येतात, तेव्हा संशयित कुठेतरी गडप होतात. मोजक्याच संशयितांतून होणाऱ्या दहशतीमुळे रात्री अकरानंतर खाद्य पदार्थांच्या गाड्या बंद करण्याचे आदेश आले. त्यानुसार गाड्या बंद झाल्या. रात्रीच्या घटकाला उपाशी घर गाठण्याची वेळ आली. रोजगाराला खीळ बसली आणि गैरसोय वाट्याला आली. त्यामुळे संशयितांचा वावर रोखण्यास पोलिसांनी कायदेशीर दंडुका उगारण्याची गरज वाढली आहे.

