मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / मिरजेतील प्रभाग क्रमांक २० मधील ख्वाजा वस्ती येथून कोल्हापूर रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याबाबत मिरजेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये श्रेय- वादाचे राजकारण सुरू आहे. या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न नगरसेविका संगीता हारगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत हारगे यांनी घेऊन प्रभागातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला.
ते म्हणाले, नवीन रस्त्यासाठी २०१८ पासून पाठपुरावा केला आहे. तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील व जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांची मदत झाली. या रस्त्यासाठी प्रयत्न केल्याचा हारगे पती-पत्नीचा दावा चुकीचा आहे. मागील पावणेपाच वर्षात त्यांनी येथील जनतेसाठी कोणतेही काम केले नसल्याची टीका नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली. आर्थिक गैरव्यवहार केल्याचा तसेच दहशत माजवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप ही त्यांनी हारगे यांच्यावर केला.
मिरजेतील प्रभाग क्रमांक २० मध्ये असलेल्या ख्वाजा वस्ती रस्त्याचा राष्ट्रवादीचेच नगरसेवक संगीता हारगे – योगेंद्र थोरात यांच्यात श्रेयवाद उभारला आहे. यातून परस्परांवर टीका करण्यात येत आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन थोरात यांनी हारगे यांच्यावर आरोप केले.
थोरात म्हणाले, निवडून आल्यानंतर प्रभागात २१ कोटींहून अधिक विकास कामे केली. त्यापैकी साडेपाच कोटी रुपयांची कामे ख्वाजा वस्ती परिसरात केली. पिण्याचे पाणी, गटारे ,शाळा, हॉस्पिटल ,रस्ते ,काँक्रीट रस्ते, ख्वाजा वस्तीच्या मागील बाजूने दोन रस्ते हॉट मिक्स डांबरीकरण केले आहेत. हारगे यांनी मागील पाच वर्षात कोणतीही विकास कामे केली नाहीत. स्वतःचे उद्योग चालवण्यासाठी नगरसेवक झाले आहेत. केवळ दहशत माजवली जाते. त्यासाठी नगरसेवक पदाचा गैरवापर करतात. मागील निवडणुकी वेळी, महापौर तसेच स्थायी समिती सभापती निवडीवेळी आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप त्यांनी हारगे यांच्यावर केला.
गैर कृत्य करूनही पक्षाचा पाठिंबा..!
“नगरसेवक योगेंद्र थोरात म्हणाले, अभिजीत हारगे यांनी जातीवाचक शिवीगाळ करून हल्ला केला. नगरसेविका संगीता हारगे या मागासवर्गीय सेलच्या महिला सदस्यांना जातीवाचक बोलल्या. मात्र या दोघांची हकालपट्टी पक्षातून होत नाही. त्यांची पदे जात नाहीत. मी २३ वर्षे या पक्षात आहे. सूर्यवंशी माझ्या नंतर येऊन महापौर होतात. केवळ जातीमुळे मी महापौर होऊ शकत नाही. मला कुठलेच पद मिळत नाही. भाजपने मागासवर्गीयांना विविध पदे दिली. मी भाजपमध्ये असतो तर महापौर झालो असतो. त्यामुळे राष्ट्रवादी हा पक्ष जातीवादी आहे, असे मला वाटते. पुढील निवडणूक मागासवर्गीयांना न्याय देणारे कोणी पुढे आले तर त्यांच्यासोबत लढवणार..”