मिरज : गोपनीय खबऱ्या प्रतिनिधी/ मिरज तालुक्यातील कदमवाडी हद्दीत, ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून जवळपास २५ ते ३० वर्षापासून स्मशानभूमी नसल्याने गैरसोय होत आहे.
एखादं मयत झाले तर दहन करण्यासाठी सुमारे दोन तीन किलोमीटर प्रेताची फरफट करत आपल्या मालकी हक्काच्या जमिनीत दहन करत आहेत. पावसाळ्यात अंत्यसंस्कार आणि दहन करण्याचा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी ५ लाख, व जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री तानाजीराव पाटील यांच्या विकास फंडातून ५ लाख असा निधी मंजूर करण्यात येऊन ,स्थळ पाहणी करून गावातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर नियोजित स्मशानभूमी मंजूर करण्यात आली आहे.
तरीही गावातीलच काही मोजक्या मंडळींनी या एकमताने मंजूर होणाऱ्या स्मशानभूमीसाठी विरोध करत न्यायालयात स्टे ऑर्डर घेण्याचा प्रयत्न सुरू आहे
सदर प्रकरणावरती ग्रामस्थ एकत्र येऊन हा लढा लढत आहेत, काहींनी विरोध केल्याने वर्षानुवर्षे सुरू असलेली स्मशानभूमी संदर्भातील फरफट आता दूर होण्याच्या मार्गावर असताना विकासकामाला खो बसत आहे.
१० लाखाच्या मंजूर कामात आता काहींच्या अडमुठेपणामुळे अडथळा निर्माण होत असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घेत स्मशानभूमीपासून वंचित असलेल्या गावाला न्याय देणे महत्वाचे ठरणार आहे.
आज गोपनीय खबऱ्याशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते बाबासो जाधव म्हणाले की, आता आम्ही शांत बसणार नाही, आम्ही पाठपुरावा करत राहू, गावकऱ्यांना समशनभूमीची अत्यंत गरज आहे. यावेळेस सरपंच विनायक कुंभार, अशोक शिवाजी चव्हाण, अर्जुन कदम, जयदीप कदम, रोहित जाधव, ज्योतिराम कदम, दशरथ शिंदे, आदी उपस्थित होते.