येरळा काठच्या शेतकऱ्यांची मागणी
कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील अवैध वाळू तस्करी काही केल्या थांबण्याचं नाव घेत नसून स्थानिक कर्मचारी वाळू तस्करांना सामील असल्याचं आता उघड उघड बोललं जातं असून कडेगाव तहसीलदारांनी आता याबाबत कठोर पावलं उचलावीत, २०१७ च्या शासकीय परिपत्रकाची अंमलबजावणी करावी अशी मागणी येरळा काठच्या शेतकऱ्यांमधून होत आहे.
बुधवारी रात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने ऊस भरून उभा असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. यात एक जण गंभीर जखमी झाला असून ट्रॅक्टर मालकाने चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा अपघात रात्री ९ च्या सुमारास घडला आहे. यावेळी टेम्पो वांगी येथून अवैध वाळू वाहतूक करत रामापूर मार्गे अन्यत्र चालला होता असं घटना स्थळावरून समजले,म्हणजे अवैध वाळू उपसा नक्की किती वाजता सुरू होतो? याचा विचार करावा. स्थानिक प्रशासन अवैध वाळू तस्करांना सामील असल्याचं आता येरळा काठच्या ग्रामस्थांमधून बोललं जात आहे. त्यामुळे आता कडेगावच्या तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांनी आता कठोर पावलं उचलावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी शासनाने १४ जून २०१७ रोजी परिपत्रक काढलं होतं. त्यात कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत त्याची अंमलबजावणी केल्यास अवैध वाळू तस्करीला पायबंद बसेल असं जानकारांचे म्हणणं आहे. त्यामुळं आता तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांनी या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी अशी मागणी होत आहे.

