नागपूर, 22 डिसेंबर :खबऱ्या प्रतिनिधी/ हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि विरोधकांचा सामना रंगला आहे. बोलू दिलं जात नसल्यामुळे अध्यक्ष महोदय, असा निर्लज्जपणा करू नका, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला होता.
त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर हिवाळी आधिवेशन संपेपर्यत निलंबन करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये आज सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दिशा सालियान प्रकरणावर विरोधकांना बोलू दिलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार मागणी केली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना बोलण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे जयंत पाटील यांनी असा निर्लज्जपणा करू नका, असं वक्तव्य केलं. त्यानंतर जयंत पाटील यांच्या विधानामुळे सत्ताधारी भाजपचे आमदार आक्रमक झाले. जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली.
त्यानंतर शंभूराजे देसाई यांनी सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात असं वक्तव्य कुणी करू नये, यासाठी कारवाई करावी अशी मागणी केली.
त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या विधानाबद्दल प्रस्ताव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी ठराव बहुमताने मंजूर केला. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे.
उद्यापासून अधिवेशन संपेपर्यंत अधिवेशनामध्ये येता येणार नाही. तर, अजित पवार यांनी, जयंत पाटील यांनी जे वक्तव्य केले त्यासंदर्भात माफी मागितली. यापुढे कुणी असं वक्तव्य करू नये, असं आवाहनही केली. दरम्यान, दिशा सालियान प्रकरणा संदर्भात राजकीय अँगलने पाहू नये.
तुम्हाला पाहिजे त्या यंत्रणे मार्फत चौकशी करू शकता. सीबीआयने रिपोर्ट दिला की हा अपघाती मृत्यू झाला आहे. दिशाच्या आई वडिलांनी हात जोडून विनंती केली की, आम्हाला बदनाम करू नका आणि आमच्या मुलीला बदनाम करू नका. जे कोणी आम्हांला बदनाम करतील त्यांना विनंती आहे की, बदनामी करू नका अन्यथा आमच्या जीवाचं बर वाईट करू, असं पत्रच अजितदादांनी सभागृहात वाचून दाखवलं. जर दिशा सालियानची पुन्हा चौकशी करण्यात येत आहे तर पूजा चव्हाण प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही पवारांनी केली.

