मिरज खबऱ्या प्रतिनिधी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व अंतर्गत रस्त्यासाठी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून शिवाजी रस्त्याच्या कामासाठी मिरजकर प्रतीक्षेत आहेत. बऱ्याचवेळा उद्घाटन होऊन सुद्धा रस्त्याच्या कामाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चक्काजाम आंदोलनात उपस्थित आंदोलकांनी केला.
या रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य वाढत आहे. शहरातून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी, रुग्ण ,नातेवाईक व रिक्षा चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याच कालावधींचा पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाला जागी करण्यासाठी मिरज करांनी एकत्र येत आज चक्काजाम आंदोलन केले. त्या चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्व एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केले. प्रसंगी मिरज शहरातील विविध संघटना व पक्ष पदाधिकारी यांनी यास पाठिंबा दर्शवत उपस्थिती दाखवली.
यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. विविध मागण्यांसह वानलेस हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा ही मुद्दा यावेळी आक्रमक पणाने मांडण्यात आला.
प्रसंगी पालकमंत्री हाय हाय च्या घोषणा देत तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळेस सामाजिक कार्यकर्ते जैलाब शेख, मराठा महासंघाचे विलास देसाई, युवक नेते इंद्रजीत घाटे, माजी नगरसेवक हरून खतीब, रिक्षा संघटनेचे महेश चौगुले, सामाजिक कार्यकर्ते धनंजय भिसे, मिरज शहर परिवर्तन समितीचे पदाधिकारी व मिरजकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संभाजी ब्रिगेड ने ही आपला भक्कम पाठिंबा असल्याचे पत्राद्वारे दाखवून दिले.
चक्काजाम आंदोलन शहरातील गांधी चौकात घेण्यात आले. यावेळेस पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.