मिरज / खबऱ्या प्रतिनिधी : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील गावे कर्नाटकमध्ये घेणार, असा दावा केल्यानंतर दोन्ही राज्यात त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. सीमा भागातील गावांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
या पार्श्वभमीवर आज (शनिवार) मिरज शहरांमध्ये कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणाऱ्या व महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये जाणारी बस वाहतूक थांबवण्यात आली. कर्नाटक मधून येणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. मिरज बस स्थानकाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी कागवाड पर्यंत बस सेवा उपलब्ध आहे.
तर मिरज आगारातून जाणाऱ्या जमखंडी, विजापूर, बेळगाव, अथनी या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी ४ बसेस मिरज आगारातून सोडण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
आज सकाळी मिरज आगारातून मिरज जमखंडी या एसटीला कागवाडच्या बॉर्डरवर कर्नाटक पोलिसांनी त्यांच्या हद्दीमध्ये प्रवेश नाकारला . त्यामुळे सदरची एसटी बस ही परत आल्याचे सांगण्यात आले.पोलीस प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात बस घेऊन जाण्याची तयारी दर्शवलेली आहे.
दरम्यान, बस वाहतूक बंद झाल्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली आहे. सांगली जिल्ह्यातील बस या कर्नाटकातील सीमेवरील गावातूनच परत येत आहेत. मात्र या मार्गावर कोठेही दगडफेक झालेली नाही, असे पोलीस आणि मिरज बस स्थानकाचे डेपो मॅनेजर दीपक हेतंबे व सहकारी एसटी वाहतूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

