
कडेगाव तालुक्यातील जनतेला कोणी वाली आहे की नाही?
कडेगाव:- कडेगाव तालुक्यात महसूल प्रशासनातील भ्रष्ट कारभाराची रोज नवनवीन प्रकरणे बाहेर येत आहेत. तालुक्यातील एका शेतकऱ्याला ज्याप्रकारे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याने लुटलं आहे की या लुटीपुढं अक्षरशः दरोडेखोर सुद्धा लाजतील. शेतकरी आणि वाहन मालक यांच्याकडून या दोघांनी तब्बल ७० हजार रुपये उकळले आणि आता संबंधित शेतकऱ्यासह दोघाना ७ लाख ९३ हजार रुपये शासकीय खात्यात जमा करावेत अशा सूचना पारित करण्यात आल्या आहेत. महसूल विभागातील कर्मचारी जर शेतकऱ्यांना अशाप्रकारे लुटत असतील तर कडेगाव तालुक्यातील जनतेला कोणी वाली आहे की नाही ? असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. माजी मंत्री डॉ विश्वजित कदम यांनी या प्रकरणात लक्ष घालून दोषींना तात्काळ निलंबित करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील एका शेतकऱ्याला आपलं शेत सपाटीकरण करावयाचे होते. या शेतात अतिरिक्त माती निघणार होती. गावात चर्चा सुरू झाल्यानंतर ही अतिरिक्त माती दुसरा शेतकरी घेऊन जातो म्हणाला. याबाबत परवानगी वगैरे घ्यावी लागते याची माहिती संबंधित दोघाना सुद्धा नव्हती. मात्र माती उचलून नेण्यासाठी वाहने लागणार तेंव्हा वाहन मालकाशी संपर्क साधल्यानंतर वाहन मालक व संबंधित शेतकरी यांनी गावच्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्याची भेट घेतली. यावेळी “तुमचं आमच्यावर लक्ष असू दे आमचं तूमच्यावर लक्ष राहिलं” असं ठरलं आणि प्राथमिक चर्चेत दोघाना १०/१० हजार इसारत देण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांनी माती घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याने मंडळ अधिकाऱ्यास रोख २० हजार रुपये दिले आणि माती घेऊन जाण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी तलाठ्याने दुसऱ्या वाहन मालकास बोलवून घेतले आणि त्याच्याकडून काहीच आले नाही असे सांगून २० हजार रुपये घेतले. त्याच दिवशी मंडळ अधिकाऱ्याने ही १०हजार रुपये घेतले . असे माती घेऊन जाणाऱ्या शेतकरी आणि दोन वाहन मालकांकडून तलाठी व मंडळ अधिकाऱ्याने ७० हजार रुपये वसूल केले.
मुळात या ७० हजारांच्या बदल्यात संबंधित शेतकऱ्याने दोन दिवसात जवळपास १०० ते १२५ ब्रास माती वाहुन नेली. आता कायदेशीर पध्दतीने जर हीच माती नेली असती तर १२५ ब्रास मातीचे ४०० रुपये ब्रास प्रमाणे ५० हजार शासकीय चलन , १० टक्के म्हणजे ५००० रुपये गौण खनिज निधी आणि किरकोळ १ ते २ हजार रुपये असा जास्तीत जास्त ६० हजार रुपये खर्च आला असता मात्र इथं तर तलाठी व मंडळ अधिकाऱ्याने ७० हजार उपटले होते. आता या ही पुढं तुघलकी कार्यवाही म्हणजे संबंधित शेतकऱ्याच्या माती उचललेल्या शेताचा पंचनामा करून विना परवाना माती उचलल्या पोटी ७ लाख ९३ हजार रुपये शासकीय खात्यावर जमा करावेत अन्यथा आपल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल अशा लेखी सूचना संबंधित शेतकऱ्यास व वाहन मालकांना देण्यात आल्या आहेत.
या घटनेने कडेगाव तालुक्यात नक्की कायद्याचं राज्य आहे की इंग्रजांचे असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. शेतकऱ्याने चूक केली आहे म्हणजे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे हा मुद्दा जरी योग्य असला तरी माती उचलण्या अगोदर तलाठी मंडळ अधिकाऱ्यास भेटूनही त्यांनी शेतकऱ्यास योग्य मार्गदर्शन न करता त्याच्याकडून भली मोठी लाच स्वीकारली आणि शेतकऱ्यास असं कृत्य करण्यास प्रवृत्त केले त्यामुळे पहिल्यांदा त्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी होत आहे.
संबंधित शेतकऱ्यास न्याय देण्यासाठी तालुक्यातील राजकीय मंडळींनी पुढं यावं तसेच माजी मंत्री डॉ विश्वजित कदम यांनी या प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालून शेतकऱ्यावरील अन्याय थांबवून दोषींवर कडक कारवाई साठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.

