प्रांताधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी
कडेगाव:- कडेगाव तालुक्यात अवैध वाळू तस्करांनी पुन्हा वर डोके काढले असून येरळा काठी वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे.शनिवारी रात्री वाळू तस्कर जोमात पाहायला मिळाले तर कडेगावचे तहसील प्रशासन मात्र कोमात असल्याचे जाणवले. कडेगाव तहसीलदार यांनी अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी नेमलेली भरारी पथके सुद्धा गायब होती याबाबत आता कडेगावचे धडाकेबाज प्रांताधिकारी गणेश मरकड यांच्याकडूनच कारवाई ची अपेक्षा येरळा काठच्या शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
कडेगाव तालुक्याला अवैध वाळू तस्करी हा विषय काही नवीन नाही. तालुक्यातील काही गावे अवैध वाळू उपशाचे केंद्र बनले आहेत. शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासनास फोन केला तरी कोणतीच कार्यवाही होत नाही उलट फोन करणाऱ्या शेतकऱ्याची इथंभूत माहिती वाळू तस्करांना पोहच होते यातून वाळू तस्करांकडून दमदाटी ,मारहाण असे अनेक प्रसंग तालुक्याने अनुभवले आहेत. अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी आजपर्यंत तरी कोणतीही ठोस पावले उचललेली येरळा काठच्या शेतकऱ्यांनी पाहिली नाहीत.
खबऱ्याने अवैध वाळू तस्करी बद्दल लिहिल्यानंतर शनिवारी रात्री वाळू तस्करी थांबेल अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी व्यक्त करीत होते मात्र झाले उलटे. शनिवारी रात्री येरळा काठी ना स्थानिक प्रशासन फिरकले ना कडेगाव तहसीलदार यांनी नेमलेली भरारी पथके, त्यामुळे वाळू तस्करांनी येरळा काठी चांगलाच धुमाकूळ घातला. याबाबत आता कडेगावचे धडाकेबाज प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी माहिती घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.