सोलापूर : कार्तिकी वारीनिमित्त पंढरीत आलेल्या वारकऱ्यांमध्ये सामील होऊन चोरी करणाऱ्या २६ जणांना ग्रामीण पोलिसांनी वारकऱ्याच्या वेशातच रंगेहाथ पकडले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पोलिसांकडून ठोस नियोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रासह परराज्यातून पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी येतात. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे भाविकांचे पैसे, मोबाईल व किमती वस्तू चोरतात. अशा प्रवृत्तीच्या लोकांचा वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे म्हणून पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली वारकऱ्यांच्याच वेशात पथके नेमली होती. पोलिस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक बिराजी पारेकर हे त्या पथकाचे नेतृत्व करीत होते. त्यांच्यासोबत गुन्हेगारांची माहिती असणारे खबरी व पोलिस अंमलदार होते. पथकातील अधिकारी व अंमलदार साध्या वेशात होते. ते सातत्याने वेश बदलून गर्दीमधील चोरट्यांवर वॉच ठेवून होते. कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहून वारकऱ्यांचे साहित्य उचकटणाऱ्यांचा शोध घेऊन पोलिसांनी एकूण २६ संशयितांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच वारीत नातेवाईक किंवा गावकऱ्यांपासून दूर गेलेल्यांनाही पोलिसांनी मदत केली. पायी चालत येणाऱ्या भाविकांना पोलिस स्पीकर्सद्वारे सूचना देत होते. जेणेकरून अपघात होणार नाही हा त्यामागील हेतू होता.
पोलिस अधीक्षकांकडून पथकाचे कौतुक
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली वारीत साध्या वेशात दोन पथके नेमली होती. त्यातील एका पथकाचे नेतृत्व पोलिस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे हे करीत होते. त्यांच्यासोबत सहायक पोलिस निरीक्षक बिराजी पारेकर, पोलिस अंमलदार शिवाजी घोळवे, श्रीकांत गायकवाड, सर्जेराव बोबडे, धनाजी गाडे, प्रकाश कारटकर, परशुराम शिंदे, विजयकुमार भरले, मोहिनी भोगे, अनिसा पटेल, लालसिंग राठोड, अजय वाघमारे, अक्षय डोंगरे, विनायक घोरफडे, समर्थ गाजरे, चालक प्रमोद माने आदी होते. या पथकाच्या कामगिरीचे पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षकांनी कौतुक केले.