कडेगाव:- खेराडे वांगी ता कडेगाव येथील महिला तलाठी मनीषा कुलकर्णी हिला सोमवारी दि १० ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. सातबारा वरील चुकीची आणेवारी दुरुस्त करण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती १५ हजार रुपये स्वीकारताना कुलकर्णी हिला रंगेहात पकडले गेले.
सातबारा दुरूस्त करणे , त्यावरील नोंदी धरणे, सातबारा वितरित करणे किंवा अन्य इतर कामांसाठी शासन भरमसाठ पगार देत असताना निव्वळ भ्रष्ट कारभार करण्याची वृत्ती फोफावलेल्या लोकांनी महसूल विभाग बदनाम केला आहे त्यात तलाठी मनीषा कुलकर्णी ह्या नावाची आता भर पडली आहे. कुलकर्णी हिचा कारभार अतिशय भ्रष्ट होता सर्वसामान्य लोकांना ती नाहक त्रास देत होती अशी चर्चा खेराडे वांगी तलाठी कार्यालय परिसरात कारवाई नंतर उघड उघड सुरू झाली होती.
ढाणेवाडी येथील एका शेतकऱ्याने तिच्या मनमानी कारभाराला कंटाळून जिल्हाधिकारी यांचेकडे तिची लेखी तक्रार केली होती परंतु “तक्रारदार शेतकरी हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने व मी महिला कर्मचारी असल्याने मला त्रास देण्याच्या उद्देशाने सदर तक्रार केली आहे” असा खुलासा कुलकर्णी हिने केला होता असे तक्रारदार शेतकऱ्याने *खबऱ्याला* सांगितले तसेच वरिष्ठांनी सुद्धा तसाच अहवाल पाठवल्याने कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची खंत संबंधित शेतकऱ्याने बोलून दाखवली. सहकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा तिला आपल्या कामकाजात बदल करून सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता असे खात्रीलायक वृत्त आहे मात्र भ्रष्ट कारभार करण्यास सोकावलेल्या कुलकर्णी हिने कोणाचे ही एकूण घेतलं नाही आणि शेवटी तिच्या भ्रष्ट कारभाराचा घडा भरला.
सातबारा वरील चुकलेली आणेवारी दुरुस्त करण्यासाठी प्रारंभी १० हजार नंतर १५ हजार आणि शेवटी २० हजार रूपये लाचेची मागणी कुलकर्णी हिने संबंधित शेतकऱ्याकडे केली होती असे समजते. आता लाचेची रक्कम वाढत कशी गेली तर , संबंधित शेतकऱ्याने तलाठी कुलकर्णी हिने लाच मागितल्याने काही राजकीय नेत्याना भेटून आपली कैफियत मांडली होती त्यावरून संबंधितांनी कुलकर्णी हिला फोन केल्याने तिचा पारा म्हणे चढला होता आणि तुमच्या वतीने जेवढे दबावाचे फोन येथील तेवढा माझा आकडा वाढणार असा सज्जड दमच म्हणे कुलकर्णी हिने संबंधित शेतकऱ्याला दिला होता.
रक्कम वाढत आहे हे पाहून नाईलाजाने शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली आणि कुलकर्णी हीचा खेळ संपला. तहसील कार्यालयात कारवाई होऊन बहुधा महिना झाला नसावा अजून ही कारवाईला विसर पडण्यासारखा कालावधी ही झाला नव्हता तरीही किरकोळ कारणासाठी एवढी मोठी लाच घेण्याचे धारिष्ट्य कुलकर्णी हिने दाखवले म्हणजे तिला आणि तिच्या कारभाराला सलाम ठोकला पाहिजे.

